Join us  

वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

विराटचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहता त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला असता तर त्याचे कर्णधारपद जाणे निश्चित होते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:22 PM

Open in App

विराट कोहली ( Virat Kohli) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराटनं सोशल मीडियावरून नुकतीच ही घोषणा केली. त्याला आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळायचे आहे. त्याचवेळी वन डे व कसोटी संघाच्या कर्णधारपदावर तो कायम राहणार आहे. विराटचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहता त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला असता तर त्याचे कर्णधारपद जाणे निश्चित होते. २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी ( उपविजेता), २०१९ चा वन डे वर्ल्ड कप ( उपांत्य फेरी) आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ( उपविजेता) यात विराटला अपयश आले होते.

विराटनं काय म्हटलं होतं?

भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. 

कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम

इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली. 

आता विराटची आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. Great Learings ची ही जाहीरात आहे आणि त्यावर विराटनं लिहिलं आहे की, ''आपल्या आयुष्यात कधी कधी वाईट दिवस येतो, परंतु खचू नका आपण कुठे चुकतोय याचा विचार करा आणि झोकात पुनरागमन करा.'' आता विराटच्या या पोस्टचा त्याच्या कारकिर्दीतील घडामोडींशी संदर्भ लावला जात आहे.

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App