मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडू, साहाय्यक प्रशिक्षक आणि मुख्य प्रशिक्षक यांना आपापल्या पत्नी व गर्लफ्रेंड यांना सोबत घेऊन जाण्याची विनंती कर्णधार विराट कोहलीने केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याची ही विनंती मान्य केल्याचे वृत्त बुधवारी एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. त्यावर प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना इडल्जी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले. कोहली आणि बीसीसीआय यांच्यात या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या,''असा कोणताही निर्णय झालेला नाही. अजून काही लोकांचे मत घेतले जाणार आहेत. त्यामुळे अजून कालावधी लागणार आहे. जे काही वृत्त प्रसिद्ध झाले आहे, ते चुकीचे आहे,'' असे इडल्जी यांनी सांगितल्याचे ANI ने ट्विट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या पत्नींना नेण्यास
बीसीसीआयने एक अट घातली होती. त्यानुसार केवळ दोन आठवडेच खेळाडूंना आपल्या पत्नींना परदेश दौऱ्यावर घेऊन जाता येत होते. त्यावर कोहलीने तीव्र नाराजी प्रकट केली होती. त्याने संपूर्ण मालिकेत पत्नींना सोबत नेण्याची विनंती केली होती. विराटच्या या हट्टासमोर बीसीसीआय पुन्हा झुकल्याचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले होते.