Join us  

Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं

इंडियन प्रीमिअर लीगचे १६वे पर्व सुरू आहे... ४३ सामने आतापर्यंत झाले आहेत आणि पहिल्या टप्प्यात तरी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हाच सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिला आहे...

By स्वदेश घाणेकर | Published: May 02, 2023 4:49 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे १६वे पर्व सुरू आहे... ४३ सामने आतापर्यंत झाले आहेत आणि पहिल्या टप्प्यात तरी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हाच सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिला आहे... भारताचा माजी कर्णधार आणि आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार धोनी याची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा सुरू आहे ( तशी ती २-३ वर्षांपासून आहे). ४१ वर्षीय धोनीच्या गुडघ्याला दुखापत झालीय आणि तरीही तो खेळतोय.. माहीला आयपीएलमध्ये अखेरचं खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजारो समर्थक येत आहेत.. त्यामुळेच मुंबईच्या वानखेडेवर, कोलकाताच्या इडन गार्डनवर, बंगळुरूच्या चिन्नास्वामीवर, राजस्थानच्या मानसिंग स्टेडियमवर यजमान संघापेक्षा धोनीचेच चाहते अधिक दिसले... धोनी फॅक्टर वगळल्यास यंदाची आयपीएल ही रटाळ, कंटाळवाणी आणि प्रचंड वेळ खाऊ झालेली पाहायला मिळाली ( कालचा प्रसंग सोडला तर)...

कोरोनाच्या काळानंतर प्रथमच आयपीएल होम-अवे फॉरमॅटमध्ये होत आहे.. जिओ सिनेमा, स्टार स्पोर्ट्स या आयपीएल प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांनी आकडेवारीचे रेकॉर्ड मोडल्याचा दावा केला आहे. पण, ४३ सामने उलटूनही आयपीएलने जसा पिकअप पकडायला हवा होता, तसा दिसत नाही.... धोनी धोनी धोनी.... हेच काय ते आतापर्यंतच्या यंदाच्या पर्वातीच टप्प्यातील केंद्रस्थान राहिले आहे. रिंकू सिंग, टीम डेव्हिड यांनी काही थरारक लढती जिंकून दिल्या, परंतु रोहित शर्माला अद्याप हवा तसा सूर गवसलेला दिसत नाही... बेन स्टोक्स, सॅम करन, कॅमेरून ग्रीन या महागड्या खेळाडूंनी त्यांच्या फ्रँचायझींना डबघाईला आणले आहे. इम्पॅक्ट प्लेअरचाही अपेक्षित प्रभाव पडलेला दिसलेला नाही. 

Wide, No Ball साठी DRS ही संकल्पना चांगली असली तरी उगाच वेळ घालवण्यासाठी संघ मुद्दाम त्याचा वापर करताना दिसत आहेत. अम्पायर्सच्या निर्णयाचा दर्जाही खालावलेलाच दिसतोय... आयपीएल सामना संपायला विलंब होतो, म्हणून वेळ बदलून ७.३० अशी केली गेली, परंतु ८ वाजता सुरू होऊन ११.३० ला संपणारा सामना तो आजही त्याच वेळेत संपतोय... परवा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना साडेचार तास रंगला... DRS च्या नियमामुळे हा विलंब होतोय आणि त्याचा प्रक्षेपण करणाऱ्यांनाच आर्थिक फायदा मिळतोय... हे सगळं गणित आहे...

तरीही आयपीएलचा TRP झपकन वर नेण्यासाठी वाद व्हायलाच हवा, हे शास्त्र ठरलेलं आहे. प्रत्येक आयपीएलमध्ये तसे घडताना दिसले. यंदाच्या आयपीएलमध्ये कालपर्यंत मोठा राडा झालाच नव्हता. तो विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या निमित्ताने झाला... सामना खेळताना प्रतिस्पर्धींना डिवचणे, हे काही नवीन नाही. पण, 'Delhi Boys' चा सोशल मीडियावर आवाका पाहता आयपीएलच्या हे फायद्याचे ठरले... काल रात्री झालेल्या राड्याची अजूनही चर्चा आहे आणि ती पुढील २-३ दिवस TRP साठी पोषक ठरणारी नक्की आहे... मनोरंजनाचा खेळ असलेला क्रिकेट हा स्वतः कधी 'मनोरंजक' झाला, हे चाहत्यांना अद्यापही कळलेले नाही. शेवटी भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे... 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीगौतम गंभीरबीसीसीआय
Open in App