टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगचा मोठा विक्रम मोडीत काढला. या खेळीसह विराट आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
रिकी पॉन्टिंगला टाकले मागे
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावांचा विक्रम आतापर्यंत रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने ३३५ सामन्यांत १२ हजार ६६२ धावा केल्या होत्या. मात्र, विराटने केवळ २४७ डावांमध्ये १२ हजार ६७६ धावा पूर्ण करून पॉन्टिंगला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजारांपेक्षा जास्त धावा करणारे कोहली आणि पॉन्टिंग हे जगातील एकमेव फलंदाज आहेत.
इंदूरच्या मैदानावर पहिले शतक
विराटसाठी इंदूरचे होळकर मैदान आतापर्यंत फारसे फलदायी ठरले नव्हते. यापूर्वी खेळलेल्या ४ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र, आज त्याने १२४ धावांची (१०८ चेंडू) दमदार खेळी करत या मैदानावरील शतकाचा दुष्काळ संपवला. हे विराटचे एकदिवसीय क्रिकेटमधील ५४ वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८५ वे शतक ठरले आहे.
२१ जानेवारीपासून टी-२० मालिकेला सुरुवात
विराटच्या या झुंजार शतकानंतरही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. भारताला या सामन्यात ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट ९३ धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते, तर दुसऱ्या सामन्यात तो केवळ २३ धावा करू शकला होता. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ पाहुण्या न्यूझीलंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेला येत्या २१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.