Join us  

Pulwama Attack : पाकविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:33 PM

Open in App

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने शेजारील राष्ट्राशी सर्व संबंध तोडून टाकावेत अशा भावना देशवासीय व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याला जशासतसे उत्तर देण्याची भाषा केली. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने त्यांच्याशी आयात-निर्यात व्यवहारही बंद केले आहेत. या दोन देशांना क्रिकेटने नेहमी जोडले आहे, परंतु पुलवामा हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये क्रिकेट सामनाही नको, असा ठाम मतप्रवाह निर्माण होत आहे. त्यामुळेच आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. या मागणीला भारताच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शविला आहे, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. 

कर्णधार विराट कोहलीनंही प्रसार माध्यमांना सामोरे जाताना याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कसून सराव करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहलीनं प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले. तो म्हणाला,'' पुलवामा येथे जे काही घडले, ते खूपच वेदनादायी होते. संपूर्ण संघ शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. आम्ही देशासोबत आहोत... त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, याचा निर्णय सरकार घेईल. सरकार व बीसीसीआय यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.'''पाकविरूद्ध खेळावे की नाही, हे केंद्र सरकारला ठरवू द्या'सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कपिल देव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ‘पुलवामा हल्ल्यानंतर विश्वचषकात भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही,’ हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारल्यावर स्पष्टपणे मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी त्यावर थेट उत्तर द्यायचे टाळले. ते म्हणाले, ‘‘या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका बुद्विवान माणूस मी नाही. भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, याचा निर्णयआपण सरकारला घेऊ द्यायला हवा.’’

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा, सांगतोय सचिन तेंडुलकर पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळावं की नाही, हा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. बीसीसीआयने हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. या प्रश्नावर आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपले मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला की, " भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल."

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाविराट कोहलीसचिन तेंडुलकरकपिल देवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय