Join us

विराटची झुंज ठरली अपयशी, ऑस्ट्रेलियाचा ३२ धावांनी विजय

सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३२ धावांनी पराभूत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:41 IST

Open in App

रांची : सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३२ धावांनी पराभूत झाला. आॅस्ट्रेलियाचे ३१४ धावांचे आव्हान भारताला पेलेले नाही. भारतीय संघ ४८.२ षटकांत २८१ धावांच करु शकला. विराट कोहलीने (१२३) दिलेली एकाकी झुंझ अपयशी ठरली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.रांचीच्या पाटा खेळपट्टीवर आॅस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले. भारताला चांगली सलामी मिळाली नाही. शिखर धवन (१) व रोहित शर्मा (१४) यांना स्वस्तात बाद करत आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताला धक्का दिला. कर्णधार विराट कोहली व धोनी यांनी सुरुवातीला सावध खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या धोनीला सूर गवसला नाही. त्याने ४२ चेंडूत २६ धावा केल्या. अ‍ॅडम झंपाने धोनीचा अडथळा दूर केला. धोनी बाद झाल्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूलाही चमक दाखवता आली नाही. झंपाने त्याला वैयक्तिक २ धावसंख्येवरच बाद केले. केदार जाधव व विराट कोहली भारताला विजय मिळवून देतील अशी स्थिती असतानाच केदार (२६) झंपाच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीने आपला दर्जा दाखवून देताना कारकिर्दीतील ४१ वे शतक झळकावले. ९५ चेंडूत १६ चौकार व एका षटकाराच्या साह्याने त्याने आपली शतकी खेळी सजवली. विजयासाठी आवश्यक धावगती राखण्याच्या प्रयत्नात तो झंपाच्या गोलंदाजीवर १२३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या विजय शंकर (३२), रविंद्र जडेजा (२४), कुलदीप यादव (१०) यांचे प्रयत्न भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. भारताचा डाव २८१ धावांत संपुष्ठात आला. आॅस्ट्रेलियाकडून कमिन्स, झंपा व रिचर्डसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.तत्पुर्वी कर्णधार अ‍ॅरोन फिंच व उस्मान ख्वाजा यांनी सलामीला केलेल्या १९३ धावांच्या भागीदारीमुळे आॅस्ट्रेलियाने ५ बाद ३१३ धावांचा डोंगर रचला. उस्मान ख्वाजा (१०४ धावा, ११३ चेंडू) याने वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच शतक झळकावले. फिंचने ९३ धावा करीत सूर गवसल्याचे सिद्ध केले. ग्लेन मॅक्सवेलने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावांचे उपयुक्त योगदान दिले. मार्कस स्टोइनिस (नाबाद ३१) आणि अ‍ॅलेक्स कॅरी (नाबाद २१) यांनी सहाव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी केली. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले.

टॅग्स :विराट कोहली