- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमत
इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भरीव कामगिरी केल्यानंतरही अंतिम फेरी गाठू न शकल्याची निराशा वगळता भारतीय संघ २0१९ मध्ये क्रिकेटच्या सर्वच प्रकारांत सर्वोत्तम ठरला. तथापि, काही आठवड्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत ३0 मिनिटांच्या खराब खेळामुळे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्याचे म्हटले होते. वैयक्तिकरीत्या कोहलीची कर्णधार आणि फलंदाज म्हणून कामगिरीही जबरदस्त ठरली.
भारतीय कर्णधार हा अत्यंत प्रेरीत आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहे; परंतु कर्णधार म्हणून त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्याला पुढील दोन वर्षांत आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. २0२0 ऑक्टोबरमध्ये टी-२0 विश्वचषक स्पर्धा आहे, तर २0२१मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशीप फायनल आहे. वर्ल्डकपमधील धक्का वगळता भारताची वर्षातील कामगिरी खूप नेत्रदीपक ठरली आहे. सर्व
कसोटी मालिका जिंकताना भारताने सलग ३८ महिने आयसीसी रँकिंगमधील अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
वैयक्तिक क्रमवारीत यावर्षी कोहली आणि रोहित शर्मा हे वनडे क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कसोटी क्रिकेट क्रमवारीतही विराट कोहली अव्वल आहे. वर्षातील जवळपास उत्तरार्ध दुखापतीमुळे खेळू न शकलेला बुमराह गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत सहाव्या आणि वनडे रँकिंगमध्ये अव्वल आहे.
मोहंमद शमी (४२ विकेट्स) वर्षातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच त्याने ८ कसोटीत ३३ गडी बाद केले आहेत. भारताकडून अनेकजणांनी चांगली कामगिरी केली असली तरी कोहली, शमी आणि शर्मा यांनी सातत्यपूर्ण निर्णायक कामगिरी केली आहे. कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळे भारताचे रँकिंगमधील स्थान उच्च आहे. तो जिंकण्यासाठी खेळतो आणि आपल्या खेळाडूंकडूनही त्याला अशीच अपेक्षा असते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संस्कृती बदलली आहे.