Virat Kohli Anushka Sharma in Alibaug: स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीची कायम विविध कारणांमुळे चर्चा रंगली असते. विराट-अनुष्का ही जोडी गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर लंडनला स्थायिक होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अनेकदा ते आपल्या मुलांसह लंडनमध्ये फिरतानाही दिसतात. त्यामुळे ही चर्चा खरी असली तरीही, नुकतेच या जोडीने महाराष्ट्रातील अलिबागजवळ ५ एकर जमीन विकत घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहली-अनुष्काने अलिबागमध्ये ५.१ एकर म्हणजेच सुमारे २१,००० चौरस मीटर जमीन विकत घेतली आहे. या जमिनीचा व्यवहार एकूण ३७.८६ कोटी रुपयांना झाला. अलिबागजवळील झिराड (Zirad) या गावात ही जमीन आहे. १३ जानेवारी २०२६ ला या जागेचा व्यवहार झाल्याची माहिती Real Estate डेटा फर्म CRE Matrix ने दिली आहे. या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणून सुमारे २.२७ कोटी रुपये आकारण्यात आले.
विराट कोहलीच्या वतीने त्याचा भाऊ विकास कोहली यांनी या व्यवहाराची औपचारिकता पूर्ण केली. ही जमीन 'समिरा लँड असेट्स प्रायव्हेट लिमिटेड' (Samira Land Assets Pvt Ltd) च्या संचालिका सोनाली अमित राजपूत यांच्याकडून खरेदी करण्यात आली आहे. यात दोन लगतच्या भूखंडांचा (Plots) समावेश आहे. यापूर्वी २०२२ मध्येही या दांपत्याने अलिबागमध्ये १९.२४ कोटी रुपयांना सुमारे ८ एकर जमीन खरेदी केली होती, जिथे त्यांनी आता एक आलिशान व्हिला बांधला आहे. तज्ज्ञांच्या मते, विराट आणि अनुष्कासारख्या सेलिब्रिटींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे अलिबागमध्ये जमिनीच्या किमती वाढण्याची आणि तेथे इतर श्रीमंत गुंतवणूकदार आकर्षित होण्याची जास्त शक्यता आहे. अलिबाग हे सध्या मुंबईतील सेलिब्रिटी आणि उद्योजकांसाठी 'सेकंड होम' किंवा सुट्टी घालवण्यासाठीचे सर्वात पसंतीचे ठिकाण बनत चालले आहे.