सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकून इतिहास घडवला. भारताने मेलबर्नवर जवळपास 36 वर्षांनी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याचा मान मिळवला. या विजयानंतर कोहली किती आनंदात असेल हे सांगण्याची गरज नाही. पत्नी अनुष्का शर्मा सिडनीत दाखल झाल्याने त्याच्या या आनंदात आणखी भर पडली आहे. या जोडीनं ऑस्ट्रेलियात दणक्यात New Year सेलिब्रेशन केलं.
कोहलीनेही ट्विटरवर नवीन वर्ष आपल्या लाडक्या व्यक्तीसोबत म्हणजेत अनुष्कासोबत साजरं केल्याची पोस्ट टाकली. त्याने सर्व चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 137 धावांनी यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमरा ( 9 विकेट) या विजयाचा शिल्पकार ठरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका विजयाची चव चाखण्यासाठी कोहली व सहकारी उत्सुक आहेत.