Join us  

शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम

शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 4:32 PM

Open in App

मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. विदर्भाचा संघ फक्त इतक्यावरच थांबला नाही, तर या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद  जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. गुरवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

पाहा विदर्भाचा कर्णधार काय म्हणाला

 

हुतात्म्यांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सीआरपीएफ जवानांना इराणी करंडकादरम्यान विदर्भ आणि शेष भारताच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. चौथ्या दिवशी मैदानावर उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून दहशतवादी कृत्याचा निषेध केला. गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४०जवान मृत्युमुखी पडले होते.

शेष भारत संघाने विदर्भापुढे विजयासाठी २८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विदर्भाच्या संघाने शेष भारत संघावर सहा विकेट्स राखून केली.

विदर्भाने या सामन्यात पहिल्या डावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे शेष भारतीय संघापुढे विजय मिळवण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे शेष भारताच्या संघाने ३ बाद ३७४ या धावसंख्येवर आपला दुसरा घोषित केला आणि विदर्भापुढे विजयासाठी २८० धावांचे आव्हान ठेवले होते.

शेष भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विदर्भाला फैझ फझल या सलामीवीराला गमवावे लागले. त्यावेळी विदर्भाच्या खात्यात एकही धाव नव्हती. त्यानंतर संजय रामास्वामी आणि अथर्व तायडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या भागीदारीने विदर्भाच्या विजयाचा पाया रचला गेला. राहुल चहारने रामास्वामीला बाद करत ही जोडी फोडली. रामास्वामी बाद झाल्यावर अथर्वही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि चहारनेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अथर्वने यावेळी आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७२ धावांची खेळी साकारली. 

दोन्ही स्थिरस्थावर झालेले फलंदाज बाद झाल्यावर सामना आपल्या बाजूने पलटवण्याची शेष भारत संघाकडे चांगली संधी होती. पण यावेळी गणेश सतिश हा शेष भारताच्या मार्गातील अडसर बनला. सतिशने संघाला स्थैय मिळवून देण्याची जबाबदारी चोख बजावली. सतिशने शेष भारतीय संघाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. शेष भारताच्या गोलंदाजांनी त्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण सतिशने दमदार फलंदाजीचा नुमना पेश करत शेष भारताला विजयापासून परावृत्त केले. गणेश सतिशने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८७ धावांची खेळी साकारली. संघाला विजयासाठी ११ धावांची गरज असताना सतिशने मोठा फटका मारण्याचे ठरवले. हनुमा विहारीच्या गोलंदाजीवर सतिश मोठा फटका मारायला गेला, पण यावेळी तो अपयशी ठरला. कारण सीमारेषेवर असलेल्या संदीप वॉरियरने त्याचा सहज झेल पकडला.

टॅग्स :विदर्भ