U19 World Cup 2026 India U19 Won By 18 Runs vs Bangladesh U19 : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियानं १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्व बाद २३८ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेशच्या संघाला २९ षटकांत १६५ धावांचे टार्गेट मिळाले होते. पण त्यांना हे आव्हान पेलले नाही. चांगली सुरुवात केल्यावर कर्णधाराची विकेट पडताच बांगलादेशचा संघाची फलंदाजी कोलमडली. २८.३ षटकांत १४६ धावांवर बांगलादेशचा संघ आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशचा कर्णधार विजयात अडथळा बनून उभा होता, पण...
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश यांच्यातील सामना बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वैभव सूर्यावंशीनं ६७ चेंडूत केलेल्या ७२ धावांच्या खेळीनंतर अभिग्यन अभिषेक कुंडूनं केलेल्या ८० धावांच्या खेळीच्या जोरावर युवा टीम इंडियाने ४८.४ षटकांत २३८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने २३८ धावा केल्यावर डकवर्थ लुईस नियमानुसार, मिळालेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या कर्णधार मोहम्मद अझीझुल हाकीम तमिम याने अर्धशतक झळकावले. युवा टीम इंडियाच्या विजयात तो मोठा अडथळा होऊन उभा राहिला होता. पण, खिलन पटेलनं त्याची विकेट घेतली अन् त्या एका चेंडूवर हा सामना युवा टीम इंडियाच्या बाजूनं फिरवला.
U19 World Cup : १७ वर्षीय बॅटरचं द्विशतक हुकलं! पण विश्वविक्रमासह वैभव सूर्यवंशीसमोर ठेवलं चॅलेंज
नेमकं काय घडलं! मॅच कुठं फिरली?
१६५ धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने दमदार सुरुवात केली. २१ व्या षटकात २ विकेट्स गमावत बांगलादेशनं १०६ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना बांगलादेशच्या बाजूनं झुकला होता. २२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विहान मल्होत्रानं बांगलादेशला तिसरा धक्का दिला. २३ व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीला आला अन् टीम इंडियाला त्याने चौथे यश मिळवून दिले. बॅक टू बॅक षटकात विहान याने दोन विकेट्स घेतल्या. पण बांगलादेशचा कर्णधार अजूनही मैदानात होता. अखेरच्या ३० चेंडूत ६ विकेट्स हातात असताना बांगलादेशला विजयासाठी ४० धावांची गरज होती. २५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खलिन पटेल याने मोहम्मद अझीझुल हाकीम याची विकेट घेतली. ही विकेट मॅचचा एक टर्निं पाइंटच होती. विहान मल्होत्रा याने भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.