- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफीचे प्रथमच विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. कायम चढउतार अनुभवणाऱ्या संघासाठी ही अतिशय मोठी कामगिरी आहे. १९५९-६० पासून खेळणाऱ्या या संघाच्या हातात ६७ वर्षांनंतर मानाचा किताब आला. कठोर संघर्षाचा हा परिणाम आहे. हा संघ दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. एकदा तर त्यांनी मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले होते. हार मानली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा नाहीत. राज्य क्रिकेट संघटनाही काही प्रमाणात विस्कळीत राहिली. भौगोलिक विषमता मोठी असल्याने काही खेळाडू जम्मूहून, तर काही काश्मीरमधून येतात. दिवंगत क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, इरफान पठाण, सध्याचे प्रशिक्षक अजय शर्मा यांनी संघाला एका सूत्रात बांधले. कर्नाटककडे लोकेश राहुल, करुण नायर, मयंक अग्रवाल, प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू असतानाही जम्मू-काश्मीरने हार मानली नाही.
४० वर्षांपूर्वी झाला सामना : काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सामना भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात १९८६ ला खेळला गेला होता. जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंना प्रेरणेचा अभाव जाणवत होता. त्यासाठी ते टीव्ही, इंटरनेटवर अवलंबून होते. ही परिस्थिती बदलू शकते. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत. पुढे ही संख्या वाढू शकते.
सांघिक प्रयत्नांचे फळ
जम्मू-काश्मीरसारख्या साधारण संघाला जेतेपद मिळवून देण्यात कर्णधार पारस डोगरा याचे योगदान विलक्षण आहे. ४१ वर्षांचा डोगरा अखेरपर्यंत ठामपणे उभा राहिला. शिवीगाळ, ‘हेडबट’सारख्या प्रसंगांनाही त्याने तोंड दिले. त्याने कामरान इकबाल, शुभम पुंडिर यांसारख्या खेळाडूंना प्रेरणा दिली. यावर हसन, साहिल लोतरा, कन्हैया वधावन यांनीही संपूर्ण हंगामात चमकदार कामगिरी केली. गोलंदाज आकिब नबी दार याने उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात प्रत्येकी ५-५ बळी घेत कमालच केली. एकूणच हा विजय सांघिक प्रयत्नांचा परिणाम आहे.
काय बदल शक्य?
जेतेपदाचा परिणाम राष्ट्रीय क्रिकेट पटलावर होणार आहे. बीसीसीआयचा जम्मू-काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. राष्ट्रीय निवड समिती राज्यातील प्रतिभांचा शोध अधिक गांभीर्याने घेईल. सामाजिक परिणामही होईल. सामाजिक-राजकीय अडचणी आणि दहशतवादाचा सामना करणाऱ्या राज्यातील लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. खेळ सर्वांना एकत्र आणतो. जेतेपदामुळे पुन्हा सिद्ध झाले की, खेळ समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन ठरू शकतो. काश्मीरमधील प्रश्न सोडवण्यास मदतही करू शकतो.