Join us  

'ते' मला कधीही फोन करू शकतात…आक्रमक खेळून विजय मिळविता येतो

इंग्लिश फलंदाज जॉनी बेयरस्टोने कसोटी क्रिकेटमध्ये आपण मनापासून खेळत नसल्याचा सुनील गावसकर यांचा दावा फेटाळून लावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:44 AM

Open in App

पुणे : भारताविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये ३३७ धावांचे लक्ष्य केवळ ४३.३ षटकांत पूर्ण करणाऱ्या इंग्लंड संघाचा सलामवीर फलंदाज जॉनी बेयरस्टोने रविवारी खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक लढतीत आमच्या संघाची आक्रमक व बेदरकार प्रवृत्ती कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. मालिकेतील पहिल्या लढतीत ६६ चेंडूंमध्ये ९४ धावांची खेळी करणाऱ्या या सलामीवीर फलंदाजाने शुक्रवारी ११२ चेंडूंमध्ये १२४ धावा फटकावत इंग्लंडच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. इंग्लंड संघाने या लढतीत २० षटकार लगावले.

मालिकेत बरोबरी साधल्याबाबत बोलताना बेयरस्टो म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास हे सहज घडत आहे. जास्त षटकार ठोकायचे आहेत, याबाबत संघात कुठली चर्चा झाली नव्हती.’ या लढतीत बेयरस्टोने ७ षटकार, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बेन स्टोक्सने ९९ धावांवर बाद होण्यापूर्वी १० षटकार लगावले. भारताविरुद्ध यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने २०१५ मध्ये एवढे षटकार ठोकले होते.

बेयरस्टो म्हणाला, ‘जगभर जर तुम्ही खेळाची पद्धत बघितली तर टी-२० किंवा ५० षटकांच्या लढतीत जास्तीत जास्त षटकार, चौकार ठोकणारे संघ विजयी ठरत असल्याचे निदर्शनास येते. जर तुम्ही चौकाराऐवजी षटकार लगावत असाल तर हा आकडा आणखी वाढतो. शुक्रवारच्या लढतीत आम्ही २० षटकार लगावले. एका लढतीसाठी ही असाधारण संख्या आहे. आम्ही जर असेच चौकार-षटकार लगावत राहू तर गोलंदाजांवर दडपण राखू शकतो. त्यांना कल्पना असते की थोडी चूक झाली तरी षटकार लागू शकतो.’

दरम्यान, त्याने सांगितले की, ही पद्धत नेहमी यशस्वी ठरते, असे नाही. जसे पहिल्या वन-डेमध्ये घडले. बेयरस्टोचे वन-डे क्रिकेटमधील हे ११ वे शतक आहे. त्याची नजर इंग्लंडतर्फे सर्वाधिक शतके लगावणारा फलंदाज होण्यावर आहे. त्याने सर्व शतके २०१७ मध्ये डावाची सुरुवात करण्यास प्रारंभ केल्यानंतर लगावली आहेत. शतके ठोकण्याच्या बाबतीत ज्यो रुट (१६), कर्णधार इयोन मॉर्गन (१३) व मार्कस ट्रेस्कोथिक (१२) त्याच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

इंग्लिश फलंदाज जॉनी बेयरस्टोने कसोटी क्रिकेटमध्ये आपण मनापासून खेळत नसल्याचा सुनील गावसकर यांचा दावा फेटाळून लावला आहे. दुसऱ्या सामन्यात बेयरेस्टोने शतक ठोकले. भारताविरुद्ध अखेरच्या दोन कसोटीत तो शून्यावर बाद झाला होता. यावर गावसकर  यांनी बेयरेस्टो मैदानावर जास्त वेळ थांबवण्यास इच्छुक दिसत नसल्याची टीका केली होती. या टीकेवर त्याने प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या सामन्यानंतर तो म्हणाला, ‘गावसकर काय म्हणाले हे मी ऐकलेले नाही, त्यांच्यात आणि माझ्यात संभाषण किंवा कोणता पत्रव्यवहार झाला नसताना त्यांनी हे मत कसे बनविले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.“ते मला कधीही फोन करू शकतात…त्यांचे स्वागत आहे. मी त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची माझी इच्छा आणि कसोटी खेळताना होणारा आनंद याबद्दल त्यांच्याशी चर्चा करेन. माझा फोन चालू आहे. त्यांना हवे असेल तर फोन किंवा मेसेज करू शकतात,”

टॅग्स :भारतइंग्लंड