Join us  

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना

आता विश्वचषक संपल्यावर मात्र पंच धर्मसेना यांनी मात्र आपली ही चूक मान्य केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 8:10 PM

Open in App

नवी दिल्ली, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडने बाजी मारली, पण मन जिंकली ती न्यूझीलंडने. पण या सामन्यात टीकेचे धनी ठरले ते पंच. कारण या सामन्यात पंचांकडून मोठ्या चुका झाल्या आणि याचा सामन्याच्या निकावरही परीणाम झाला. पण आता विश्वचषक संपल्यावर मात्र पंच धर्मसेना यांनी मात्र आपली ही चूक मान्य केली आहे.

विश्वचषकाचा अंतिम सामना रंगात आला असताना बेन स्टोक्सने एक फटका मारला. हा फटका मारून तो दोन धावा घेण्यासाठी पळत सुटला. दुसऱ्या धावेसाठी माघारी फिरत असताना त्याच्या दिशेने मार्टिन गप्तिलने थ्रो केला. त्यावेळी स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषे पार गेला. त्यावेळी इंग्लंडला सहा गुण बहाल करण्यात आले. त्यावेळी चाहते पंचांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाली.

याबाबत पंच धर्मसेना यांनी सांगितले की, " आता टीव्ही रीप्ले पाहिल्यावर माझ्याकडून चूक झाली हे मला कळून चुकले आहे. पण मैदानात मात्र टीव्ही रीप्ले पाहता येऊ शकत नव्हते. पण मैदानात मी जे निर्णय घेतले त्याचे मला वाईट वाटत नाही. त्यावेळी मी जे निर्णय घेतले त्यावर आयसीसीही नाराज नव्हती."

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात महत्वाचा निर्णय ठरला होता तो 'ओव्हर थ्रो'वर इंग्लंडला बहाल करण्यात आलेल्या सहा धावा. या सहा धावांमुळे इंग्लंडचा संघ विजयासमीप पोहोचला होता. पण अंतिम फेरीतील हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्यामुळेच हा 'ओव्हर थ्रो'चा नियम बदलण्यात येणार असल्याचे बदलले जात आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले. निर्धारित 50-50 षटकं आणि सुपर ओव्हर यांच्यातही सामना बरोबरीत सुटला होता. पण, सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. क्रिकेट चाहत्यांना आयसीसीचा हा नियम काही पटलेला नाही. या व्यतिरिक्त अंतिम सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेला एक निर्णयावरही टीका होत आहे आणि तो म्हणजे 'ओव्हर थ्रो'.

 

इंग्लंडला अखेरच्या तीन चेंडूंत 9 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टने टाकलेला फुलटॉस चेंडू बेन स्टोक्सनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला. पण, मार्टिन गुप्तीलनं तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं फेकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्सच्या बॅटीला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला. कुमार धर्मसेनानं सहकारी पंचांशी चर्चा करून इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या. त्यानंतर हे समीकरण 2 चेंडूंत 3 धावा असे झाले आणि इंग्लंडने सामना बरोबरीत सोडवला.

अंतिम सामन्यात झालेल्या जोरदार टीकेमुळे आता हा नियम बदलण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. आयसीसीने यापूर्वी दोन नियम बदलले आहेत. आता हा नियमही बदलला जाईल, असे म्हटले जात आहे. एमसीसीची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये ओव्हर थ्रो'चा नियम बदलला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

नियम काय सांगतो?आयसीसीच्या नियम 19.8 नुसार इंग्लंडला देण्यात आलेल्या सहा धावा या चुकीच्या ठरतात. त्यांना पाच धावा मिळायला हव्या होत्या. ओव्हर थ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण, थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा. या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुप्तीलने थ्रो केला त्यावेली स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभागही ओलांडलेला नव्हता. त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंडला पाचच धावा मिळायला हव्या होत्या. तसे झाले असते तर न्यूझीलंडने एका धावेने जेतेपद पटकावले असते. मग सुपर ओव्हर घेण्याचीही गरज भासली नसती.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंडबेन स्टोक्सकेन विलियम्सन