Join us  

मालिका गमविल्यानंतर रोहितला खेळविण्यात अर्थ नाही

इयोन मोर्गनने आपल्या गोलंदाजांचा शिताफीने वापर करीत फलंदाजांवर दडपण आणले. श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता भारताचा एकही खेळाडू स्थिरावू शकला नाही. १२५ धावांचे लक्ष्य त्यांनी सहजपणे गाठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 4:45 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -

पहिल्या टी-२० त इंग्लंडने भारतावर आठ गड्यांनी नोंदविलेला विजय फारच प्रभावी होता. झटपट हा प्रकार फारच बेभरवशाचा असतो. पण भारताने जो खेळ केला तो पाहता पुढच्या चार सामन्यांसाठी चिंता वाढविणारा आहे. या प्रकारात इंग्लंड अव्वल तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र पहिल्या लढतीत चुरस नव्हतीच. दोन संघांच्या कामगिरीत बरीच तफावत होती. अर्थात पहिल्या ते अखेरच्या षटकापर्यंत भारत स्पर्धेत नव्हताच. (There is no point in Rohit playing after losing the series) इयोन मोर्गनने आपल्या गोलंदाजांचा शिताफीने वापर करीत फलंदाजांवर दडपण आणले. श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता भारताचा एकही खेळाडू स्थिरावू शकला नाही. १२५ धावांचे लक्ष्य त्यांनी सहजपणे गाठले. नाणेफेकीचा कौल मोर्गनच्या बाजूने जाणे सामन्याच्या निकालावर परिणामकारक ठरले असे म्हणणे योग्य नाही. भारताची फलंदाजी बहरली असती तर मोर्गनचा निर्णय फसवा ठरला, असा ठपका ठेवता आला असता.     आर्चर, वूड, जॉर्डन आणि स्टोक्स यांच्या वेगवान माऱ्याला आदिल राशिद या फिरकीपटूने बळ दिले. शिवाय भारताने अंतिम एकादशची निवड चांगली केली नव्हती, हे निष्पन्न झाले. विजयाचे सर्व श्रेय इंग्लंडच्या वेगवान माऱ्यास जाते. उसळी घेणारे चेंडू टाकून भारताच्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी जाळ्यात अडकविले. दुसरीकडे भारताने खेळपट्टीचा वेध घेतला असेलही पण  गोलंदाजांची निवड करताना कोहलीने चूक केली. रोहितच्या सोबतीला राहुल सलामीला येईल, असे आधी  कोहली म्हणाला होता. मात्र नाणेफेकीनंतर कळले की रोहित या सामन्यातच नव्हे तर पुढच्या सामन्यातही खेळणार नाही.   टी-२० संघात आधी नसलेल्या ऋषभला फॉर्मच्या बळावर संधी दिली हे योग्य , मात्र रोहित संघात असता तर मॉर्गनला डावपेच बदलण्यास बाध्य व्हावे लागले असते. शिखर धवन आणि राहुल लवकर माघारी फिरले. कोहली देखील बेजबाबदार फटका मारुन भोपळा न फोडता परतला. या तीन धक्क्यातून संघ नंतर सावरलाच नाही. रोहित दुसऱ्या सामन्यात नसणार. 

- या मालिकेत भारतासाठी फलंदाजी हा एकमेव चिंतेचा विषय नाही. गोलंदाजी देखील दुबळी वाटते. लक्ष्य कमी होते, मात्र काल भारताच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या धावा घेण्यावर अंकुश देखील लावला नाही. बुमराहच्या अनुपस्थितीत धावा रोखण्याची जबाबदारी अन्य वेगवान आणि फिरकी गोलंदाजांची आहे. 

- गोलंदाज धावा रोखणार नसतील तर कोहली डोके खाजविणारच. भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भक्कम आहेच, पण पराभवातून लवकर बोध घ्यावा लागेल. त्यासाठी फार आक्रमक होण्याची गरज नाही. प्रतिस्पर्धी संघातील कच्चे दुवे पाहून वर्चस्व गाजवावे लागेल. 

- तिन्ही प्रकारात खेळणाऱ्यांवर आधुनिक क्रिकेटमध्ये दडपण येते. त्यांना विश्रांती आणि सावरण्याची संधी मिळावी हे मान्य आहे. विश्वचषकाआधी टी-२० ची हीच संधी असल्याने अनेक खेळाडूंना संधी दिली जात असल्याचे सांगितले जाते. पण मालिका गमविल्यानंतर मात्र रोहितला खेळविण्यात अर्थ उरणार नाही. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली असती तर कदाचित्र चित्र वेगळे राहिले असते.

टॅग्स :अयाझ मेमनक्रिकेट सट्टेबाजीभारतरोहित शर्मा