मतीन खान
आयपीएल १५ मधील सुरूवातीच्या पाच सामन्यांत केवळ एकच सामना असा होता की, ज्यात आधी फलंदाजी करणारा संघ जिंकला. तो होता राजस्थान रॉयल्स. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला टी-२०मध्ये अतिरिक्त लाभ मिळण्यामागील कारण काय असावे...
१) निर्धारित लक्ष्य
लक्ष्य पुढे असल्याने फलंदाज त्यानुसार रणनीती ठरवतो. लखनऊविरूद्ध आपण पाहिले की गुजरातने सुरूवातीला गडी गमावल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत वेगवान फटकेबाजी करत सामना जिंकला. यावरून हे सिद्ध होते की, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघातील सातव्या-आठव्या स्थानावरील फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले तर ते अखेरच्या पाच षटकांत ७०-७५ धावांचे लक्ष्य साध्य करून देऊ शकतात.
२) मोठमोठे गोलंदाज ‘फेल’
डेथ ओव्हरमध्ये धावा रोखू शकेल, अशी अपेक्षा असलेल्या बुमराहसारख्या गोलंदाजाला अखेरच्या षटकात धावा मोजाव्या लागल्या. मुख्य गोलंदाजांच्या दुसऱ्या डावातील कामगिरीवर नजर टाकूया...
संघ गोलंदाज विश्लेषण
मुंबई इंडियन्स बुमराह ३.२-०-४३-०
आरसीबी सिराज ४-०-५९-२
लखनऊ आवेश खान ३.४-०-३३-१
३) आधी गोलंदाजी करणे सोपे
याऊलट जेव्हा एखादा संघ आधी गोलंदाजी करतो तेव्हा याच गोलंदाजांचे विश्लेषण वेगळे असते. पहिल्या सामन्यात उमेश यादवने चेन्नईविरूद्ध किती प्रभावी मारा केला हेदेखील पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनेही लखनऊविरूद्ध भेदक मारा केला. दोघेही सामनावीर पुरस्काराचे मानकरी बनले.
त्यांची आकडेवारी पाहुया...
संघ गोलंदाज विश्लेषण
केकेआर उमेश यादव ४-०-२०-२
गुजरात मोहम्मद शमी ४-०-२५-३
पंजाब अर्शदीप सिंग ४-०-३१-१
पंजाब राहुल चाहर ४-०-२२-१
४) धडाकेबाज फटकेबाजी
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाचा मोठा लाभ असा की, चांगला मारा करणाऱ्या गोलंदाजाविरूद्ध फलंदाज फटकेबाजीचा धडाका लावतो. विशेषत: रिव्हर्स स्विप किंवा स्विच हिट खेळतो तेव्हा सामन्याचे चित्र पालटते. एबी डिव्हिलियर्स आणि आता राहुल तेवतिया हे यात तज्ज्ञ ठरले. तेवतियाने रवी बिश्नोईला रिव्हर्स स्विपवर षटकार खेचला. अशाच फटक्यांमुळे बिश्नोईच नव्हे तर अन्य गोलंदाजांचा उत्साह मावळतो. फलंदाजाला कुठल्या प्रकाराचा चेंडू टाकावा, हे कळनासे होते. अशावेळी सर्वच गोलंदाजांवर फलंदाज मानसिक विजय मिळवतो आणि लक्ष्य गाठणे त्याच्यासाठी सोपे होते.
(लेखक स्पोर्ट्स हेड - लोकमत पत्रसमूहाचे सहायक उपाध्यक्ष आहेत)