Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final - मुंबई क्रिकेट संघाने विक्रमी ४२ वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी विदर्भवर १६९ धावांनी विजय मिळवला. ८ वर्षानंतर मुंबईने रणजी करंडक जिंकला आणि त्यांच्यावर बक्षीसाचा वर्षाव झाला. बीसीसीआयकडून विजेत्या संघाला ५ कोटींचे बक्षीस दिलं जातं. त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशननेही ५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं. त्यामुळे रणजी करंडक विजेत्या मुंबईच्या संघाला १० कोटीची लॉटरी लागली आहे.
मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या, पण, विदर्भाला १०५ धावाच करता आल्याने मुंबईला ११९ धावांची आघाडी मिळाली. त्यात मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा करून विदर्भासमोर तगडे लक्ष्य ठेवले. ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विदर्भाचा दुसरा डावा ३६८ धावांवर गडगडला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी २, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि ऍपेक्स कौन्सिलने रणजी करंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए मुंबई रणजी करंडक विजेत्या संघाला अतिरिक्त ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.