Test Cricket New Rule: क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) ने २०२६ साठी नवीन कायदे नियम जाहीर केले आहेत. या कायद्याअंतर्गत क्रिकेटचे अनेक नियम बदलण्यात आले आहेत, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. एमसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये एक नियम बदलला आहे, ज्यामुळे या फॉरमॅटमध्ये अधिक उत्साह निर्माण होईल. क्रिकेटमधील बरेचसे नियम फलंदाजधार्जिणे असतात असे बोलले जाते. पण हा नवा नियम गोलंदाजी संघाला मदतनीस ठरू शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये नियमात मोठा बदल
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम १२.५.२ नुसार, दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास कसोटी क्रिकेटमध्ये दिवसाचा खेळ थांबवला जाणार नाही. सामान्यतः दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास, त्या वेळी दिवसाचा खेळ थांबवला जायचा. त्यानंतर फलंदाजी करणारा संघ दुसऱ्या दिवशी त्यांच्या रणनीतीनुसार फलंदाजाला मैदानात उतरवायचा. पण आता एमसीसीच्या नियमांनुसार, शेवटच्या षटकात विकेट पडल्यास, सामना त्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत चालू राहील. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सामन्यावर नियंत्रण मिळविण्यात किंवा विरोधी संघावर दबाव आणण्यास मदत होईल. म्हणजेच मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नवीन कायद्यानुसार, जर कसोटी सामन्यात दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली, तर खेळ तिथेच थांबणार नाही, शेवटचा षटक पूर्ण होईपर्यंत खेळ सुरू राहील.
महिला क्रिकेटमध्येही झाला बदल
एमसीसीच्या नवीन नियमांनुसार, महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये (१३ वर्षांखालील) वापरल्या जाणाऱ्या चेंडूमध्ये मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये चेंडूचे वजन १४० ते १५१ ग्रॅम दरम्यान होते आणि आकार २१-२२.५ सेमी होता, परंतु नवीन नियमांनुसार, आता चेंडूचे वजन १४० ग्रॅम ते १४९ ग्रॅम दरम्यान असेल आणि त्याचा आकार २१.५ ते २२ सेमी असेल. आतापर्यंत, ज्युनियर क्रिकेटमध्ये (१३ वर्षांखालील) वजन १३३-१४४ ग्रॅम होते आणि आकार २०.५-२२ सेमी होता. परंतु नियमांमध्ये बदल झाल्यानंतर, वजन १४०-१४४ ग्रॅम आणि आकार २०.५-२१ सेमी असेल.