Join us  

रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!

Team India Head Coach: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचीच निवड होईल असे ठामपणे बोलले जात होते आणि तसे झालेही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:42 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचीच निवड होईल असे ठामपणे बोलले जात होते आणि तसे झालेही. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समितीनं या पदासाठी पाच उमेदवारांची मुलाखात घेतली. दिवसभर चाललेल्या या मुलाखतीनंतर सायंकाळी अखेरीस शास्त्रींच्या नावाची घोषणा करण्यात आली. वेस्ट इंडिजच्या फिल सिमन्स यांनी माघार घेतल्यानं पाचच उमेदवार राहिले होते. पण, त्यापैकी दोघांनी शास्त्रींना टफ फाईट दिली. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पुन्हा मुलाखती होतील. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. कपिल देव म्हणाले,''ही निवड करणे सोपे नव्हते. सर्वच उमेदवार तगडे होते. प्रत्येकाची मुलाखत घेतल्यानंतर आम्ही तिघंही प्रत्येकी 100 पैकी गुण देत होते. पण, ते गुण एकमेकांना सांगत नव्हतो. सर्व मुलाखती झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या गुणांची बेरीज केली आणि त्यात शास्त्री अव्वल ठरले. पण, फार थोड्या फरकाने त्यांना हे प्रशिक्षकपद मिळाले. मी आता मार्क सांगणार नाही, परंतु माईक हेसन आणि टॉम मुडी यांनी त्यांना कडवी टक्कर दिली. हेसन व मुडी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.'' जुलै २०१७ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडे दुसऱ्यांदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया २१ कसोटी सामने खेळली आणि त्यापैकी १३ सामने जिंकली. वनडे सामन्यांचा विचार केल्यास, शास्त्री गुरुजींच्या कार्यकाळात झालेल्या ६० सामन्यांपैकी ४३ सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. तसंच, टी-२० मध्येही ३६ पैकी २५ सामन्यांत भारताने विजयोत्सव साकारला आहे. हे एक कारण त्यांच्या नियुक्ती मागचे आहे. पण या नियुक्तीमागे एक मोठे कारण असल्याचेही म्हटले जात आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआयकपिल देव