भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख तारा आणि फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग सध्या एका कठीण कौटुंबिक प्रसंगातून जात आहे. रिंकूचे वडील खानचंद यांची प्रकृती खालावल्याने क्रीडा जगतात चिंतेचे वातावरण पसरले असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.
रिंकू सिंगचा इथपर्यंतचा प्रवास हा निव्वळ योगायोग नसून तो प्रचंड संघर्षाचा परिपाक आहे. मूळचे बुलंदशहरच्या दानपूर गावचे असलेले हे कुटुंब २५ वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात अलीगडला आले. वडील खानचंद यांनी गॅस एजन्सीमध्ये घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे कष्टाचे काम केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, दोन खोल्यांच्या घरात राहून रिंकूने क्रिकेटचे स्वप्न पाहिले. सुरुवातीला रिंकूने नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती. परंतु, रिंकूची जिद्द पाहून वडिलांनी त्याला पाठिंबा दिला.
रिंकूच्या आयुष्यात असाही एक काळ होता, जेव्हा आर्थिक विवंचनेमुळे त्याने झाडू मारण्याचे आणि फरशी पुसण्याचे काम करण्याचा विचार केला. मात्र, क्रिकेटवरील निष्ठेने त्याला सावरले. रणजी ट्रॉफी, उत्तर प्रदेशतील विविध वयोगटातील संघ आणि सेंट्रल झोनसाठी खेळल्यानंतर २०१७ मध्ये त्याला आयपीएलचे तिकीट मिळाले. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संधी दिली आणि या संधीचे त्याने सोन करून दाखवले.
२०१९ मध्ये जेव्हा बीसीसीआयने रिंकूवर तीन महिन्यांची बंदी घातली होती, तेव्हा तो मानसिकदृष्ट्या खचला. मात्र, अशा कठीण काळातही वडिलांनी त्याला धीर दिला आणि पुन्हा मैदानात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले. आज जेव्हा रिंकू भारतीय टी२० संघाचा महत्त्वाचा भाग बनला. रिंकू सिंगला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात त्याच्या वडिलांनी रक्ताचे पाणी केले. मात्र, आता त्यांची प्रकृती बिघडली आहे, त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी संपूर्ण देश देवाकडे साकडे घालत आहेत.