T20 World Cup, Shoaib Akhtar on Team India : भारतीय संघानं बुधवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करताना अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयानं टीम इंडिंयाच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अफगाणिस्तानच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. अशात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यानं भारतीय चाहत्यांना खचू नका, असा सल्ला देताना दोन पराभव झाले असले तरी स्पर्धेतील चुरस कायम आहे, असेही म्हटले.
भारतीय संघानं फायनलमध्ये प्रवेश करावा अशी अख्तरचीही इच्छा आहे, कारण त्याला पाकिस्तानकडून पुन्हा एकदा विराट अँड कंपनीला पराभूत होताना पाहायचे आहे. खरं पाहिलं तर भारताची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता फार कमीच आहे, त्यांना न्यूझीलंडच्या सामन्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. ४६ वर्षीय अख्तरनं यावेळी भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स्ड असल्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.
त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला त्यात तो म्हणतोय,''भारत-अफगाणिस्तान सामना पुर्वनियोजित होता किंवा आधीच ठरवलेला होता, या चर्चा करणं थांबवा. अशा चर्चांनी स्पर्धेची प्रतीमा डागाळते. माझा अफगाणिस्तान व भारत या दोघांनाही पाठिंबा आहे. बघुया यापैकी कोणता संघ जादू करतो.''
ग्रुप २ मध्ये पाकिस्ताननं चार सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान व न्यूझीलंड हे आघाडीवर आहेत. भारताचा पुढील फेरीतील प्रवास जर-तरच्या निकालांवर अवलंबून आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा ( ७४) व लोकेश राहुल ( ६९) यांनी १४.४ षटकांत १४० धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी अनुक्रमे ३५ व २७ धावा करताना संघाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला. अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या. मोहम्मद शणीनं ३२ धावांत ३, तर आर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या.