नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा नाकारल्यानंतर आता पाकिस्ताननेही भारतासोबत खेळण्यास नकार देऊन आडमुठी भूमिका घेतली आहे. या वादावर भारताचे माजी क्रीडा मंत्री आणि विद्यमान भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "जर पाकिस्तान भारतासोबत खेळण्यास तयार नसेल, तर आयसीसीने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जागतिक क्रिकेटमधून निलंबित करावे व फंडिंग रोखावे," अशी आक्रमक मागणी ठाकूर यांनी केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीने 'हायब्रिड मॉडेल' वापरत पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये ठेवले आहेत. तरीही पाकिस्तानने बांगलादेशला फितवत भारतात न खेळण्याचा हट्ट करण्यास सांगितले होते. या चक्रव्युहात बांगलादेश चांगलाच फसला असून आयसीसीने बांगलादेशला थेट स्पर्धेतून काढून टाकले आहे. यावरून पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानच्या या भूमिकेला 'खेळात राजकारण' आणण्याचा प्रयत्न म्हटले आहे.
अनुराग ठाकूर यांनी काय म्हटले?
"जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीवरून होणारा दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत भारताने तिथे जाऊन खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आयसीसीला आपला महसूल सर्वात जास्त भारताकडून मिळतो. जर एखादा देश जागतिक स्पर्धेत खेळण्यास नकार देऊन वेळापत्रक विस्कळीत करत असेल, तर त्या देशावर बंदी घालणे आवश्यक आहे. भारतासोबत न खेळण्याचा निर्णय हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी आत्मघातकी ठरेल, कारण भारतीय संघामुळेच जागतिक क्रिकेटची अर्थव्यवस्था चालते'', असेही त्यांनी नमूद केले.
आता आयसीसी पाकिस्तानविरुद्ध काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.