T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याला सोशल मीडियावरून अपशब्द वापरले गेले. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच टीम इंडिया पाकिस्तानकडून पराभूत झाली आणि त्याचा दोष काही बिनडोक लोकांनी मोहम्मद शमीवर लावला. शमीनं या सामन्यात ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या आणि त्यामुळेच टीम हरली, असा दावा करताना टीकाकांनी शमीच्या देशप्रेमावरच बोट ठेवले. काल दिवसभर संपूर्ण प्रकरण तापलेलं असताना बीसीसीआय किंवा टीम इंडियातील एकाही सदस्यानं शमीला पाठींबा देणारे ट्विट किंवा विधान केलं नाही. पण, मंगळवारी बीसीसीआयनं मोजक्या शब्दात टीकाकारांना सुनावताना शमीच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला. “Proud, Strong, Upward and onward,” असे ट्विट बीसीसीआयनं केलं.
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा", असं इरफान पठाण म्हणाला.
"मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ला अतिशय आश्चर्यकारक आहे. मी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि जो कुणी भारतीय संघाची कॅप परिधान करतो त्याच्या मनात देशाप्रती सर्वोच्च भावना असते. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखवून दे", असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. तर मोहम्मद शमी आम्हाला तुझा अभिमान आहे, असं ट्विट युजवेंद्र चहल यानं केलं आहे.
फेसबुकनं ते मॅसेज डिलिट केले...
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून मोहम्मद शमीवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. तसे मॅसेज त्याच्या फेसबूकवर करण्यात आले होते आणि फेसबूकनं ते त्वरित डिलिट केले.