टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणारा भारताविद्धच्या सामना न खेळण्यासंदर्भात पाकिस्तानने घोषणा केली होती. मात्र, त्याला आपल्या निर्णयावर 'यू-टर्न' घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भारतासंदर्भात गरळ ओकताना दिसत आहे.
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने बीसीसीआय अथवा आयसीसीवर दबाव येईल, असे पाकिस्तानी माजी क्रिकेटर्सना वाटले होते. मात्र, झाले उलटेच, पीसीबीवरचाच दबाव वाढला आणि अखेर त्यांना भारतासमोर झुकावे लागले. या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रीदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, केवळ चार गुजराती लोक भारत चालवत आहेत, असे तो म्हणत आहे.
समा टीव्हीवरील एका शोमध्ये तो म्हणाला, "भारताला सध्या चार गुजराती चालवत आहेत. दोन विकत आहेत आणि दोन खरेदी करत आहेत. जर खालच्या पातळीवर काम करणाऱ्यांना याच चार लोकांना खूश करायचे असेल तर, असे चालत नाही." खरे तर आफ्रिदीच्या या वक्तव्यावरून आयसीसीसमोरील पाकिस्तान क्रिकेटची हतबलता स्पष्टपणे दिसते.
भारत आणि पाकिस्तान टी२० वर्ल्ड कपमध्ये एकाच गटात (अ) आहेत. हा हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. तत्पूर्वी, पाकिस्तानने बहिष्काराची भाषा केली असताना, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले होते की, विरोधी संघ येवो अथवा न येवो, भारतीय संघ मैदानात उतरेल. भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पाकिस्तानलाच आपल्या नर्णयावरून माघार घ्यावी लागली आहे.