Join us  

T20 World Cup, IND vs BAN : विराट कोहलीने No Ball देण्याचा इशारा केला, शाकिब फलंदाजाकडे धावत आला अन्... 

T20 World Cup, India vs Bangladesh : रोहित शर्मा लगेच माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 3:01 PM

Open in App

T20 World Cup, India vs Bangladesh : रोहित शर्मा लगेच माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारताला मजबूत स्थितीत आणले. पण, या सामन्यात विराट व बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. १६व्या षटकात हा प्रकार घडला.  

ज्याने कॅच टाकला, त्यानेच Rohit Sharma ला घरचा रस्ता दाखवला; कॅप्टन अपयशी ठरला, Video 

रोहित व लोकेश यांनी खणखणीत फटके मारून आशादायक चित्र दाखवले, परंतु रोहितने निराश केले. तस्कीन अहमनदने टाकलेल्या तिसऱ्या षटकात रोहित शर्मा ( Rohit Sharma)ने उत्तुंग फटका मारला, परंतु हसन महमूदने सोपा झेल टाकला. नेदरलँड्सविरुद्ध रोहितला जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावले होते. आजही रोहित या संधीचं सोनं करेल असे वाटले, परंतु पुढच्याच षटकात महमूदने भारताच्या कर्णधाराला चूक करण्यास भाग पाडले आणि यासीर अली करवी झेलबाद केले. लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली ( Virat Kohli) याने दमदार फटकेबाजी करून भारताच्या धावांचा वेग वाढवला. लोकेशही ३२ चेंडूंत ३ चौकार व  ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. 

आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमावारीत नंबर १ बनलेल्या सूर्यकुमार यादवने त्याचा तुफान फॉर्म कायम राखताना बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराट पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भूमिकेत जात नॉन स्ट्रायकर एंडला फटकेबाजीचा आस्वाद घेत होता. या दोघांची ३८ धावांची भागीदारी शाकिब अल हसनने तोडली. सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून आज २-३ सोपे झेल टाकले आणि त्यात सूर्याचाही झेल होता. हार्दिक पांड्या ५ धावांवर बाद झाला. हसन महमदूने १६वे षटक टाकले आणि त्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर अजब प्रकार पाहायला मिळाला. 

महमूदने टाकलेला चेंडू बाऊन्सर होता आणि विराटने त्यावर फटका मारला. परंतु तो स्क्वेअर लेगच्या अम्पायरकडे NO Ball ची मागणी करताना दिसला. त्याची ही मागणी शाकिबला आवडली नाही आणि त्याने विराटकडे धाव घेतली. या दोघांमध्ये खेळीमेळीत काहीतरी चर्चा झाली आणि अम्पायरलाही हसू आवरले नाही.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहली
Open in App