भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. मात्र, या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या एका कायदेशीर वादात अडकला आहे. विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत पुणे येथील वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर हार्दिक पांड्या आपली मैत्रीण माहीका शर्मासोबत मैदानावर सेलिब्रेशन करत होता. हार्दिकने तिरंगा आपल्या पाठीला गुंडाळला होता आणि तो मैदानावर खाली झोपून सेलिब्रेशन करत होता. इतकेच नाही तर, हार्दिकच्या पाठीवर तिरंगा असताना त्याने माहीकासोबत प्रेमाचे चाळे सुरु केले. 'राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१' च्या कलम २ नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे बंधनकारक आहे.
हार्दिक पांड्याविरोधात तक्रार दाखल करूनही अद्याप पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. यावर बोलताना वकील वाजिद खान म्हणाले की, "हार्दिक हा मोठा सेलिब्रिटी असल्याने सुरुवातीला पोलिसांनी माझ्याशी केवळ सविस्तर चर्चा केली. त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे, पण केवळ आश्वासन पुरेसे नाही. जर येत्या ३ दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर मी थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागेन आणि त्यानंतर न्यायालयात धाव घेईन."
हार्दिक पांड्याने या विश्वचषकात मोलाची भूमिका बजावली होती. विशेषतः फायनलमध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, सेलिब्रेशनमधील या कथित कृत्यामुळे तो आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप हार्दिक पांड्या किंवा बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.