Join us

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती बिकट; IPL साठी आलेल्या खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली चिंता

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. याचदरम्यान आयपीएलसाठी आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 23:47 IST

Open in App

Sri Lanka Crisis : सध्या श्रीलंकेत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. त्या ठिकाणी महागाईदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बटाटे २०० रुपये किलो, तांदूळ ५०० रूपये किलो, तर नारळ तेल ८५० रुपये लिटर, एक कप चहा १०० रुपयांना मिळत आहे. देशात सध्या आणीबाणीही जाहीर करण्यात आली आहे. परंतु अशा परिस्थितीत आयपीएल (IPL 2022) खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी दु:ख व्यक्त केलं आहे.

"श्रीलंकेतील आणीबाणी आणि कर्फ्यू पाहून मला वाईट वाटलं. ज्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या गरजांकडे सध्याचे सरकार दुर्लक्ष करू शकत नाही. अशा लोकांना ताब्यात घेणं अमान्य आहे. त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावलेल्या श्रीलंकेतील त्या शूर वकिलांचा मला खूप अभिमान आहे," अशी भावूक पोस्ट श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यानं केली आहे. "चांगल्या नेत्यांकडूनही चुका होतात. आपल्या देशातील लोकांना संकटाच्या वेळी एकजुट होऊन राहण्याची गरज आहे. या समस्या मानवनिर्मित आहेत आणि योग्य व्यक्तींद्वारे त्या समस्यांचं निराकरणही केलं जाऊ शकतं. देशाच्या अर्थव्यवस्थेला नियंत्रित करणारे काही लोक जनतेचा विश्वास गमावत आहेत. देशवासीयांना विश्वास मिळवून देण्यासाठी एका चांगल्या टीमची गरज आहे. ही वेळ काम करण्याची आहे," असंही तो पुढे म्हणाला. जयवर्धनेव्यतिरिक्त, सध्या पंजाब किंग्जमधील श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) यानंही आपलं मत मांडलं आहे. "मी माझ्या देशापासून अनेक मैल दूर आहे, परंतु जे दररोज लढत आहेत त्या माझ्या देशवासियांच्या वेदना मला जाणवत आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांचा आवाज दाबला जात आहे. जेव्हा २२ दशलक्ष आवाज एकत्र येतात तेव्हा ते दाबले जाऊ शकत नाही," असं ट्वीट त्यानं केलं आहे.

टॅग्स :श्रीलंकाआयपीएल २०२२
Open in App