Join us  

विराटसोबतच्या वादावर सौरव गांगुलीने अखेर मौन सोडले; म्हणाला, त्याचे कर्णधारपद...

विराट कोहलीने ( Virat Kohli) जेव्हा तडकाफडकी कर्णधारपद सोडले तेव्हा बराच गदारोळ झाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 2:15 PM

Open in App

विराट कोहलीने ( Virat Kohli) जेव्हा तडकाफडकी कर्णधारपद सोडले तेव्हा बराच गदारोळ झाला... वाद रंगले... सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी बीसीसीआयकडे बोटे दाखवली गेली. या गदारोळात, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ( Sourav Ganguly) जो त्यावेळी BCCI अध्यक्ष होता, त्याला सूत्रधार ठरवले गेले. चाहत्यांनी कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आता, सौरव गांगुलीने मौन सोडले आहे आणि विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्यात त्याचा काहीही सहभाग नव्हता, असे सांगितले. गांगुलीच्या विधानाने या वादग्रस्त मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 'दादागिरी अनलिमिटेड सीझन १०' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बोलताना सौरव गांगुलीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याने विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेतले नसल्याचे स्पष्ट केले. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, कोहलीने स्वतः ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्यात रस नसल्याची भावना व्यक्त केली. प्रत्युत्तरादाखल, गांगुलीने मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचे सुचवले आणि कोहलीने स्वेच्छेने ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी फॉर्मेटमधील कर्णधारपद सोडले.

फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला होता. गांगुली म्हणाला, “मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही. हे मी खूप वेळा सांगितले आहे. त्याला ट्वेंटी-२०चे नेतृत्व करण्यास रस नव्हता. त्यामुळे, त्याने हा निर्णय घेतल्यानंतर, मी त्याला म्हणालो, जर तुम्हाला ट्वेंटी-२० मध्ये नेतृत्व करण्यास स्वारस्य नसेल, तर तुम्ही वन डे क्रिकेटमधूनही पायउतार झालात तर बरे होईल,असे मी त्याला सूचवले. कारण, मर्यादित षटकांच्या संघांसाठी एक कर्णधार व कसोटीसाठी दुसरा असे माझे मत होते.'' रोहितने टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करावे - गांगुलीबीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly)च्या मते रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असेल तर त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत संघाचे नेतृत्व करायला हवे. गांगुली म्हणाला, सध्या अनेक खेळाडू संघात खेळत नाहीत, सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करत आहे, लोकेश राहुल वन डे संघाचा कर्णधार आहे, पण एकदा रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली की, त्याला आणखी एक संधी मिळेल. तो कर्णधार असणे आवश्यक आहे. रोहितने २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, तो एक नेता आहे. त्यामुळे मला आशा आणि विश्वास आहे की तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचा कर्णधार राहील.

टॅग्स :सौरभ गांगुलीविराट कोहली