ICC Womens World Cup 2025 Sri Lanka Won Bangladesh Loss 4 Wickets In 4 Balls And First Team To Get Knocked Out : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील २१ वा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेशच्या संघाला ६ विकेट्स हातात असताना १२ चेंडूत १२ धावांची गरज होती. पण श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टू घेऊन आलेल्या शेवटच्या षटकात बांगलादेशनं चार विकेट्स गमावल्या आणि हाती आलेला सामना गमावला. या सामन्यातील पराभवासह बांगालादेशचा संघ यंदाच्या स्पर्धेतून सेमीफायनलच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परेरासह अटापट्टूच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं पार केला २०० पार धावसंख्येचा पल्ला
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघाने उत्तम गोलंदाजी करताना ४८.४ षटकात श्रीलंकेचा डाव २०२ धावांत आटोपला. श्रीलंकेकडून हसिनी परेरा हिने ९९ चेंडूत ८५ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय कर्णधार चामरी अटापट्टू ४६ (४३) आणि निलाक्षी डि सिल्वा ३७ (३८) यांनी संघासाठी उपयुक्त योगदान दिले. बांगलादेशच्या ताफ्यातून शोर्णा अख्तर हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय राबेया खान हिने दोन तर मारुफा अख्तर, निशिता अख्तर निशी आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
सामना सरळ सरळ बांगलादेशच्या बाजूनं झुकला होता, पण...
श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या २०३ धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर २४ धावा असताना दोन्ही सलामीच्या बॅटर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर कर्णधार निगार सुलताना हिने ९८ चेंडूत ७७ धावांची खेळी करत मॅच सेट केली. दुसऱ्या बाजूला शर्मिन अख्तर हिने १०३ चेंडूत नाबाद ६३ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात १२ चेंडूत बांगलादेशच्या संघाला १२ धावांची गरज होती. ४९ व्या षटकात रिबाया खान हिने रितू मौनीच्या रुपात बांगलादेशच्या संघाला पाचवा धक्का दिला. या षटकाअखेरीस बांगलादेशच्या संघानं ५ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १९४ धावा लावल्या होत्या.
अखेरच्या षटकात बांगलादेशच्या संघानं ४ चेंडूत ४ विकेट्स गमावत हातात आलेली मॅच घालवली
अखेरच्या षटकात बांगलादेशच्या संघाला ५ विकेट्स हातात असताना फक्त ९ धावांची गरज होती. कर्णदार निगार सुलतान ७७ धावांवर खेळत होती. पण अखेरच्या षटकात श्रीलंकन कर्णधार अटापट्टूनं कमालीची गोलंदाजी करत सामना लंकेच्या बाजूनं फिरवला. अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रियाबा खानला पायचित होऊन माघारी फिरली. तिची जागा घेण्यासाठी आलेली नाहिदा अख्तर सेट झालेल्या कर्णधाराला स्ट्राइक देण्याच्या नादात धावबाद झाली. तिसऱ्या चेंडूवर श्रीलकेची कर्णधार अटापट्टूनं बांगलादेशच्या सेट झालेली कर्णधार निगार सुलताना हिला ७७ धावांवर झेलबाद केले अन् सामना श्रीलंकेच्या बाजून वळवला. तिची जागा घेण्यासाठी आलेली मारुफा अख्तरही अटापट्टूच्या जाळ्यात सापडली. अखेरच्या षटकात बांगलादेशच्या संघाने फक्त १ धाव घेत ४ विकेट्स गमावल्या आणि त्यांच्यावर या सामन्यातील पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली.