मेलबोर्न : क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढल्याचा तर्क महान फिरकीपटू शेन वॉर्न याला मान्य नाही. या उलट सध्याच्या गोलंदाजांमध्ये कौशल्य वाढविण्याचा, नव्या कल्पना विकसित करण्याचा आणि आव्हानांचा सामना करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो, याबद्दल वॉर्नने चिंता व्यक्त केली.
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये २०० धावा सहज निघतात. सीमारेषा लहान झाली असून पहिल्या सहा षटकात क्षेत्ररक्षणात अनेक मर्यादा आहेत. दुसरीकडे फलंदाजांना आव्हान देता येईल, असे काहीच गोलंदाज करताना दिसत नाहीत. टी- २०त अनेक गोलंदाज सहजपणे गुडघे टेकताना दिसतात. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत कौशल्य विकसित करण्याची भूक गोलंदाजांमध्ये दिसत नाही. प्रत्येकाचा एक खराब दिवस असतो हे मान्य असले तरी गोलंदाजीचा स्तर चांगला नाही, हेदेखील खरेच,’ असे वॉर्नने ट्विट करीत म्हटले आहे. गोलंदाज दररोज ३०- ४० यॉर्कर टाकण्याचा सराव करतात का?क्रीडा विज्ञान आमच्या गोलंदाजांना याची परवानगी देत नाही काय? असा सवाल यानिमित्ताने वॉर्नने उपस्थित केला.