भारतीय संघाने २०२६ चा आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत भारताकडून झालेल्या पराभवाबाबत आफ्रिदीने केलेले दावे केवळ हास्यास्पदच नव्हे, तर तथ्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे समोर आले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना आफ्रिदीने असा दावा केला की, मोहाली येथे झालेल्या त्या ऐतिहासिक उपांत्य सामन्यात पाकिस्तानने अत्यंत दमदार सुरुवात केली होती. त्याच्या मते, पाकिस्तानने ९० धावसंख्यापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती आणि संघ मजबूत स्थितीत होता. मात्र, क्रिकेटमधील अधिकृत आकडेवारी तपासली असता आफ्रिदीचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भारताने दिलेल्या २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची स्थिती आफ्रिदी सांगतो तशी अजिबात नव्हती. पाकिस्तानची पहिली विकेट (कामरान अकमल) धावफलकावर अवघ्या ४४ धावा असताना पडली होती. तर, त्यांची दुसरी विकेट ७० धावांवर पडली. जेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ९० असताना त्यांचे दोन प्रमुख फलंदाज आधीच तंबूत परतले. त्यामुळे ९० धावांपर्यंत एकही विकेट पडली नव्हती हा आफ्रिदीचा दावा पूर्णपणे निराधार ठरला.
आफ्रिदीने आपल्या विधानात उमर अकमलचेही कौतुक करताना म्हटले की, अकमलच्या फलंदाजीमुळे भारतीय गोलंदाज घाबरले होते. मात्र, स्कोअरकार्डनुसार उमर अकमलने त्या सामन्यात मोठी खेळी केलीच नव्हती. ज्या अकमलकडून आफ्रिदीला मोठ्या अपेक्षा होत्या, त्याला हरभजन सिंगने अवघ्या २९ धावांवर क्लीन बोल्ड करून पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या होत्या.
आपल्या कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरही शाहिद आफ्रिदी अनेकदा वादग्रस्त आणि खोटे विधाने करण्यासाठी ओळखला जातो. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून स्वतःच्या संघाची बाजू सावरण्याचा त्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरला आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मते, आकडेवारी कधीही खोटे बोलत नाही आणि आफ्रिदीने पुन्हा एकदा स्वतःला तोंडघशी पाडले आहे.