मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद होते. या स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना वगळला तर सर्व लढतीत विजय मिळवले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरलेल्या संघावर निवड समितीने नाराजी प्रकट केली आहे. संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी संघात पाच बदल केले होते आणि त्यांच्या या निर्णयावर निवड समितीने नाराजी प्रकट केली.
या लढतीत भारत पराभूत होता होता थोडक्यात वाचला होता. या लढतीत कर्णधार रोहित आणि उपकर्णधार शिखर धवन यांना विश्रांती देण्यात आली होती आणि महेंद्रसिंग धोनीने संघाचे नेतृत्व केले होते. त्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार व जस्प्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजांनाही विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्याजागी संघात मनिष पांडे, सिध्दार्थ कौल, दीपक चहर आणि खलील अहमद यांना खेळवण्यात आले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राला BCCI च्या सुत्राने सांगितले की," निवड समिती या निर्णयावर नाखूश होती. कर्णधार रोहित आणि उपकर्णधार धवन यांना बसवून धोनीला पुन्हा नेतृत्व करण्यास देणे, याला काहीच अर्थ नव्हता."