Join us  

रोहित शर्मानंतर तब्बल दहा वर्षांनी मुंबईच्या फलंदाजानं इतिहास घडवला, जाणाल तर थक्क व्हाल

रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी अविश्वसनीय खेळीचा आनंद मुंबईकरांनी लुटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 4:13 PM

Open in App

रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी अविश्वसनीय खेळीचा आनंद मुंबईकरांनी लुटला. उत्तर प्रदेश संघाच्या 8 बाद 625 धावांचा पाठलाग करताना मुंबईचे चार फलंदाज 128  धावांत तंबूत परतले होते. तेव्हा मुंबई पहिल्या डावातच पिछाडीवर पडेल, असे चित्र होते. पण, मुंबईच्या ताफ्यात पुन्हा रुजू झालेल्या सर्फराज खाननं उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात आघाडीच नव्हे, तर तीन गुणांची कमाई केली. सर्फराजच्या आजच्या खेळीनं 2009 साली रोहित शर्मानं नोंदवलेल्ला विक्रमाच्या दिशेनं कूच केली.  त्यानं कारकिर्दीतले पहिले त्रिशतक पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघानं 159.3 षटकं खेळून काढताना 8 बाद 625 धावांवर डाव घोषित केला. अक्षदीप नाथ ( 115) चे शतक आणि उपेंद्र यादवच्या ( 203*) द्विशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशनं ही मोठी मजल मारली. रिंकू सिंग ( 84), मोहम्मद सैफ ( 42), सौरभ कुमार ( 44), अंकित राजपूत ( 32) आणि यश दयाल ( 41) यांनी धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. मुंबईच्या रोस्टन डायसनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे व आकाश पी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

त्यानंतर मैदानावर उतरलेल्या मुंबईचे पहिले दोन फलंदाज अवघ्या 16 धावांवर माघारी परतले. भुपेन लालवानी आणि हार्दिक तामोरे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु भुपेन 43 धावांवर माघारी परतला. सिद्धेश लाड व हार्दिक यांची जोडी फार काळ टिकली नाही. हार्दिक 51 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या सर्फराजनं उत्तर प्रदेशच्या सर्व स्वप्नांचा चुराडा केला. त्यानं सिद्धेशसह 210 धावांची भागीदारी केली. सिद्धेश 98 धावांवर माघारी परतल्यानंतरही सर्फराजची फटकेबाजी कायम राहिली.

त्यानं कर्णधार आदित्य तरेसोबतही दीडशतकी भागीदारी केली. तरेलाही शतक पूर्ण करता आले नाही आणि तो 97 धावांवर माघारी परतला.  एस मुलानीसह त्यानं मुंबईला 6 बाद 630 धावांपर्यंत मजल मारून देताना पहिल्या डावात आघाडी घेतली. या आघाडीमुळे मुंबईने तीन गुणांची कमाई केली. मुलानी 70 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावांवर नाबाद आहे, तर सर्फराज 390 चेंडूंत 30 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 300 धावांवर आहे. त्यानं खणखणीत षटकार खेचून अडीचशे धावांचा पल्ला सर केला. मुंबईकडून त्रिशतक झळकावणारा तो आठवा फलंदाज ठरला.

मागील दहा वर्षांत मुंबईच्या एकाही फलंदाजाला 250 हून अधिक धावा करता आल्या नाही. 2009 मध्ये रोहित शर्मानं नाबाद 309 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 250+ धावा करणारा सर्फराज मुंबईचा पहिलाच फलंदाज ठरला. 

टॅग्स :रणजी करंडकरोहित शर्मामुंबईउत्तर प्रदेश