Join us

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Mumbai Cricket Team: यशस्वी जैस्वाल मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून रणजी खेळणार होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:16 IST

Open in App

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Mumbai Cricket Team: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. यशस्वी जैस्वाल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना दिसतो. तो बराच काळ मुंबई टीमचा भाग आहे. पण, त्याने या वर्षाच्या सुरुवातीला गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याला ना हरकत प्रमाणपत्रही (NOC) देखील मिळाली होती. परंतु त्याने आपल्या निर्णयापासून यू-टर्न घेतला. यासंदर्भात आता रोहित शर्माचे नाव पुढे आले आहे. नेमका विषय काय, जाणून घेऊया.

यशस्वी जैस्वालच्या यू-टर्नची 'गोष्ट'

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, रोहित शर्माने यशस्वीला त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मुंबई संघातच राहण्याचा सल्ला दिला. ४२ वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईसारख्या संघाकडून खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे आणि हा एक मोठा विक्रम आहे असे रोहितने यशस्वीला समजावले. तसेच मुंबई क्रिकेटमुळेच यशस्वी जैस्वालचे टॅलेंट दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले आणि तो टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण करू शकला. त्यामुळे यशस्वीने मुंबईला आदर राखायला हवा, असेही रोहितने त्याला सांगितल्याचे अजिंक्य नाईक म्हणाले.

देशांतर्गत आकडेवारी

यशस्वीने २०१९ मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ४३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६६.५८ च्या सरासरीने ४२३३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १५ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २६५ धावा आहे. ३३ लिस्ट ए सामन्यांमध्ये, यशस्वीने ५२.६२ च्या सरासरीने १५२६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०३ धावा आहे.

टीम इंडियासाठीची आकडेवारी

भारतासाठी त्याने आतापर्यंत २४ कसोटी सामन्यांमध्ये ५०.२० च्या सरासरीने २२०९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतके आणि १२ अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूचा सर्वोत्तम धावसंख्या २१४ धावा नाबाद आहे. एका एकदिवसीय सामन्यात त्याने १५ च्या सरासरीने १५ धावा केल्या आहेत, तर २३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३६.१५ च्या सरासरीने ७२३ धावा केल्या आहेत. जयस्वालचा सर्वोत्तम धावसंख्या १०० धावा आहे.

टॅग्स :यशस्वी जैस्वालरोहित शर्मामुंबईरणजी करंडकऑफ द फिल्ड