नवी दिल्ली - वयाच्या १७ व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान दिल्यानंतर यष्टिरक्षक पार्थिव पटेल याची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिलेच आहे. कमी वयात यशस्वी व्हायला सर्वजण सचिन तेंडुलकर नाहीत. या घटनेपासून बोध घेत दिल्लीचा युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला स्थानिक सामने खेळण्याची अधिक संधी मिळावी, असे मत भारताचे महान यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले.
पार्थिवला इतक्या लवकर राष्ट्रीय संघात संधी द्यायला नको होती, असे सांगून किरमाणी म्हणाले, ‘ऋषभमध्ये प्रतिभा आहे, पण त्याला पूर्णपणे तयार होऊ द्यावे. १६ वर्षांच्या वयात प्रतिभावान कामगिरी करायला प्रत्येक जण सचिनसारखा असूच शकत नाही. पार्थिवला लवकर संधी मिळाली, पण तो तितक्याच लवकर फ्लॉपही झाला. ऋषभचे असे होऊ नये, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.’
पार्थिवने २००२ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वयाच्या १६ व्या वर्षी तो ६५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. महेंद्रसिंह धोनीनंतर भविष्यातील यष्टिरक्षक अशी ओळख असलेला ऋषभ पंत याला चार टी-२० सामन्यांत प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
वन-डे क्रिकेटमधील वर्चस्व आणि जॉन राईट यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपविल्यानंतर निकालावर भर देण्यात आला. खेळाचे तंत्र मागे पडले होते. यष्टिरक्षकांना कुठलेही मार्गदर्शन मिळू शकले नाही. जो फलंदाजीतही योगदान देऊ शकेल अशा यष्टिरक्षकाची संघ व्यवस्थापनाला गरज पडली.
- सय्यद किरमाणी