भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद सिंग यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. खानचंद हे ५८ वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत असून टर नोएडा येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या जाण्याने रिंकूवर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्याने आपल्या भावना बाजूला सारून देशहिताला प्राधान्य दिले आहे. वडिलांच्या अंत्यसंस्काराचा विधी आटोपून रिंकू आज (शनिवारी, २८ फेब्रुवारी) पुन्हा भारतीय संघात सामील होणार आहे.
रिंकु सिंग विश्वचषक मोहिमेवर असून वडिलांच्या निधानाची बातमी मिळताच तो ताबडतोब घरी परतला. वडिलांवर अंत्यसंस्कार करताना त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. त्याचा स्मशानभूमीतून बाहेर पडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात वडिलांना गमावल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, रिंकुने त्याच्या आयुष्यातील सुपरहिरो गमावलेला असतानाही त्याने देशासाठी आपले कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग शनिवारी कोलकाता येथे भारतीय टी-२० विश्वचषक संघात पुन्हा सामील होणार आहे.
रविवारचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारतासाठी नॉकआउट सारखाच असेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ गट १ मधून दक्षिण आफ्रिकेसोबत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. अशा कठीण परिस्थितीत रिंकू सिंगचे संघात परतणे हे त्याच्या मानसिक बळाचे दर्शन घडवते. चाहते आणि क्रिकेट जगत सध्या रिंकूच्या या धैर्याचे कौतुक करत असून, तो या दुःखातून सावरून रविवारी मैदानात चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.