गुवाहाटी - यंदा आयपीएलमध्ये चार डावांत दोन अर्धशतके झळकावणारा राजस्थानचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल सध्या तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीचा आनंद घेतो आहे. मात्र, फलंदाजीचा क्रम हा केवळ एक क्रमांक असून, संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
बंगळुरूविरुद्ध २०२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जुरेल तेव्हा मैदानात आला, जेव्हा राजस्थानची अवस्था १ बाद २१ अशी होती. अशा दबावाच्या परिस्थितीत त्याने ४३ चेंडूंत नाबाद ८१ धावांची झंझावाती खेळी करत संघाला सलग चौथा विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना जुरेल म्हणाला, 'गेल्या वर्षी मी पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. सरतेशेवटी, सामने जिंकणे हेच सर्वांचे मुख्य ध्येय असते. संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास ठेवून मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आहे.'
फलंदाजीच्या क्रमाबद्दल तो पुढे म्हणाला, 'तो केवळ एक क्रमांक आहे. मला स्वतःसाठी कोणताही विशिष्ट क्रमांक नकोय. माझा स्वभावच असा आहे की, जर मला आठव्या किंवा नवव्या क्रमांकावरही पाठवले, तरीही संघासाठी योगदान देण्यात मला आनंदच मिळेल. संघाला माझी जिथे गरज असेल, तिथे मी खेळायला तयार आहे.'
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीचे कौतुक
- या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या २६ चेंडूंत ७८ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या स्फोटक फलंदाजीबद्दल बोलताना जुरेल म्हणाला, जेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तेव्हा तो माझे काम खूप सोपे करून देतो.
- वैभव प्रत्येक चेंडूवर प्रहार करत होता आणि त्याला खेळताना पाहून असे वाटते की, जणू खेळपट्टीत गोलंदाजांसाठी काहीच उरलेले नाही. क्रिकेट तितके सोपे नाही, जितके सोपे तो भासवतो.