अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद जिंकले. तब्बल १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बंगळुरूच्या चाहत्यांचे स्वप्न सत्यात उतरले. दरम्यान, आरसीबीच्या संघाने हा ऐतिहासिक विजय घरच्या चाहत्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचा संघ अहमदाबादहून बंगळुरूत पोहोचला. मात्र, त्यावेळी चाहत्यांनी रस्यावर प्रचंड गर्दी केल्याने आरसीबीची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली. तसेच त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम चिन्नास्वामी स्डेडियमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र, अपेक्षेहून जास्त लोक या ठिकाणी आल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती समोर आली.
आयपीएल २०२५ चा विजेता आरसीबी संघ बुधवारी अहमदाबादहून बंगळुरूला पोहोचला. बंगळुरू पोहोचताच विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी विमानतळावर आरसीबी खेळाडूंचे स्वागत केले. बंगळुरू विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि कर्नाटक विधान सौधाच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी केली. त्यामुळे आरसीबीची विजयी मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी बंगळुरू स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शिवकुमार यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, "या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. ही एक अनपेक्षित गर्दी होती. नियोजन करण्यासाठी सरकारला पुरेसा वेळ मिळाला नाही. यासाठी मी पोलिसांना दोषी ठरवणार नाही. मी पोलीस आयुक्त आणि सर्वांशी बोललो आहे. मृतांचा नेमका आकडा आत्ताच सांगता येणार नाही. मी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतो. या घटनेनंतर अवघ्या १० मिनिटांतच कार्यक्रम आटोपण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत", असे ते म्हणाले.