आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सज्ज असलेल्या गत चॅम्पियन आरसीबीच्या संघाने एक भावूक निर्णय घेतला आहे. गतवर्षी पहिली वहिली ट्रॉफी जिंकल्यावर जेतेपदाचा आनंदोत्सव साजरा करताना एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. यात जीव गमावलेल्या ११ जणांसाठी श्रंद्धाजली म्हणून एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ११ सीट्स कायम रिकाम्या ठेवण्यात येतील, असा निर्णय कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि आरसीबी फ्रँचायझी संघांनी मिळून घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'त्या' ११ चाहत्यांच्या स्मरणार्थ महत्त्वपूर्ण निर्णय
२८ मार्चला एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं यंदाच्या IPL स्पर्धेला सुरुवात होईल. गत हंगामातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्टेडियममध्ये स्मारक पट्टिका (मेमोरियल प्लाक) बसवण्यात येणार असून ११ सीट्स कायम रिकाम्या ठेवण्यात येतील. या सीट्स त्या ११ चाहत्यांच्या स्मरणार्थ असतील, ज्यांनी या दुर्दैवी घटनेत आपला जीव गमावला. ही स्मारक पट्टिका स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ लावली जाणार आहे, जेणेकरून ती जागा कायम श्रद्धांजलीचे प्रतीक राहील. IPL सामन्यांपूर्वी पीडितांची नावे स्क्रीनवर दाखवली जातील आणि दोन्ही संघांच्या उपस्थितीत एक मिनिट मौन पाळण्यात येईल.
स्टेडियममध्ये पुन्हा सामन्यांना परवानगी
RCB च्या विजयानंतर झालेल्या या चेंगराचेंगरीनंतर जस्टिस जॉन मायकेल डी’कुन्हा समितीने स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांसाठी असुरक्षित घोषित केले होते. त्यामुळे येथे सामने घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. याच कारणामुळे आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत सर्व सामने बंगळुुच्या मैदानात नवी मुंबईला स्थलांतिरत करावे लागले. देशांतर्गत महाराजा टी-२० ट्रॉफी स्पर्धाही बेंगळुरूऐवजी मैसूर येथे आयोजित करण्यात आली होती. पण IPL आधी सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक गोष्टी पूर्ण केल्यामुळे या मैदानावर सामने खेळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
Yash Dayal Out of IPL 2026 : गत चॅम्पियन RCB च्या गोलंदाजानं माघार घेतली; की त्याला बाहेर काढलं?
दुःख पुन्हा जागे करायचे नाही, पण...
माजी क्रिकेटर आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले आहे की, "त्या दुर्दैवी घटनेचा विचार करणेही वेदनादायक आहे. मात्र व्यवस्थापन समिती आणि इतर हितधारकांसोबत आम्ही स्मारकाबाबत बराच काळ चर्चा करत होतो. त्या ११ जणांच्या आठवणींना सन्मान देणे आवश्यक असल्याचे सर्वांना वाटले. आम्हाला कुणाचे दुःख पुन्हा जागे करायचे नाही, पण त्यांना कायम लक्षात ठेवायचे आहे. म्हणूनच 'त्या' क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणार्थ शिलालेख उभारण्याचा निर्णय घेतला."