मुंबई - शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईनेरणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध घट्ट पकड मिळवली. रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिला डाव १३७.२ षटकांत ४४६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर मुंबईने हिमाचल प्रदेशची दुसऱ्या दिवसअखेर ३७ षटकांत ७ बाद ९४ धावा अशी अवस्था केली. हिमाचल प्रदेश अद्याप ३५२ धावांनी मागे आहे.
हिमाचल प्रदेशच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेने कर्णधार अंकुश बैन्स याला (१) याला झेलबाद केले आणि येथून हिमाचलने ठरावीक अंतराने बळी गमावले. बघता बघता मुंबईने हिमाचलचा अर्धा संघ ५९ धावांत गारद करत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. यादरम्यान एकनाथ सेन आणि पुखराज मान यांनी चौथ्या गड्यासाठी १०४ चेंडूंत ४१ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलानीने २३ व्या षटकात एकनाथला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर पुखराज, मयांक डागर (५) आणि आर्यमन धालिवाल (३) हेही झटपट बाद झाले. एकनाथने ५५ चेंडूंत ३ चौकारांसह १५, तर पुखराजने ६२ चेंडूंत ६ चौकारांसह ३४ धावांची झुंज दिली. हिमांशू सिंगने ३ आणि तुषारने २ बळी घेतले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा निखिल गांगता (२७*) आणि विपिन शर्मा (०*) हे नाबाद होते.
त्याआधी, ५ बाद २८९ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेल्या मुंबईने १५७ धावांची भर घातली. पहिल्या दिवसअखेर नाबाद राहिलेला शतकवीर सिद्धेश लाड रविवारी २७ धावा काढून परतला. त्याने एकूण २६० चेंडूंत १८ चौकार व एका षटकारासह १२७धावांची खेळी केली. मुंबईला भक्कम धावसंख्या गाठून देण्यात मोलाचे योगदान दिलेल्या अष्टपैलू शम्स मुलानीने १२२ चेंडूंत ९ चौकारांसह ६९ धावा केल्या. त्याने नवव्या गड्यासाठी तुषार देशपांडेसोबत १२५ चेंडूंत ७५ धावांची शानदार भागीदारी केली. तुषारने ६६ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. मयांक डागरने १११ धावांत ४ बळी घेतले. वैभव अरोरा आणि अर्पित गुलेरिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : १३७.२ षटकांत सर्वबाद ४४६ धावा (सिद्धेश लाड १२७, मुशीर खान ११२, शम्स मुलानी ६९, तुषार देशपांडे ३८; मयांक डागर ४/१११, वैभव अरोरा २/५७, अर्पित गुलेरिया २/९४.) हिमाचल प्रदेश (पहिला (पुखराज मान ३४, निखिल गांगता खेळत आहे २७, एकनाथ सेन १५; हिमांशू सिंग ३/२६, तुषार देशपांडे २/२१.)
डाव) : ३७ षटकांत ७ बाद ९४ धावा
दीड वर्षाने वानखेडेवर रंगणार रणजी सामना
४२ वेळा रणजी करंडक पटकावणारा मुंबई संघ आपला पुढील सामना १६-१९ नोव्हेंबरदरम्यान पुदुच्चेरीविरुद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे. याआधी, मार्च २०२४ मध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ हा रणजी अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर रंगला होता. हा सामना जिंकून मुंबईने विक्रमी ४२वे रणजी विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच येथे रणजी सामना खेळविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सूत्रांनी दिली.