रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध झालेल्या लढतीत धक्कादायक निकालाची नोंद करताना जम्मू काश्मीरच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. अटीतटीच्या झालेल्या या उपांत्य सामन्यात जम्मू काश्मीरने बंगालवर ६ विकेट्स राखून विजय मिळवत पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. बंगालने दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस २ बाद ४३ धावांपर्यंत मजल मारली होती. दरम्यान, आज जम्मू काश्मीरने ४ गड्यांच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग करून अंतिम फेरीमधील स्थान निश्चित केले. या लढतीत ९ बळी आणि ४२ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा औकिब नबी हा सामनावीराचा मानकरी ठरला. आता अंतिम लढतीमध्ये जम्मू काश्मीरची गाठ ही कर्नाटक आणि उत्तराखंडमधील लढतीतील विजेत्या संघाशी पडणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बंगाल आणि जम्मू काश्मीर यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीमध्ये बंगालने पहिल्या डावात ३२८ धावा काढल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना जम्मू काश्मीरचा पहिला डाव ३०२ धावांवर आटोपला होता. मात्र २६ धावांची आघाडी घेतल्यानंतर बंगालचा संघ दुसऱ्या डावात मात्र ढेपाळला होता. औकिब नबी याने ४ बळी टिपत बंगालच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे दुसऱ्या डावात बंगालचा संपूर्ण संघ केवळ ९९ धावांवर गारद झाला होता.
त्यामुळे जम्मू काश्मीरला विजयासाठी केवळ १२६ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस जम्मू काश्मीरची सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. त्यांचे दोन गडी झटपट बाद झाले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर जम्मू काश्मीरला २ बाद ४३ धावांपर्यंत मजल मारता आली होती. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा जम्मू काश्मीरला विजयासाठी ८३ धावांची गरज होती. दरम्यान, चौथ्या दिवशी जम्मू काश्मीरच्या संघाने आणखी २ गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावांच्या आव्हानाचा टप्पा गाठला आणि ऐतिहासिक विजयासह अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला.