नागपूर : गतचॅम्पियन विदर्भ व सौराष्ट्र यांच्यादरम्यान रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या रणजी ट्रॉफी फायनल लढतीत फलंदाजीमध्ये
भारतीय स्टार चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाजीमध्ये उमेश यादव यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे.
रणजी स्पर्धेतील दिग्गज वसीम जाफर स्थानिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे. ४० वर्षीय जाफरने चमकदार
फॉर्म व शानदार फिटनेस कायम राखत यंदाच्या मोसमात आतापर्यंत १००३ धावा फटकावल्या आहेत. सिक्कीमच्या मिलिंद कुमारनंतर
(१३३१) तो दुसऱ्या स्थानी आहे. जाफरने यंदाच्या रणजी मोसमात अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. सौराष्ट्र संघात पुजारासारखा
दिग्गज फलंदाज आहे; पण विदर्भाकडे त्याला चोख उत्तर देण्यासाठी जाफर आहे. यंदाच्या मोसमात त्याने एका द्विशतकासह चार
शतके ठोकली आहेत.
पुजारा सराव सत्रानंतर बोलताना म्हणाला, ‘माझ्या उपस्थितीमुळे सौराष्ट्र संघाला आघाडी मिळाली, असे नाही. संघात हार्विक देसाई
आणि अर्पित वासवडा यांच्यासारखे युवा प्रतिभावान खेळाडू आहेत. कामगिरीत सातत्य राखले तर विजेतेपदाची संधी आहे.’
उनाडकट म्हणाला, ‘११ खेळाडू मैदानावर खेळतात. आमच्यासाठी यंदाचे सत्र स्वप्नवत ठरले आहे. आम्ही बाद फेरीत काही चांगले सामने
जिंकले आहेत. हा आणखी एक सामना असून, आम्ही लय कायम राखण्यास प्रयत्नशील आहोत.’ विदर्भ संघातील ८ फलंदाजांचे
सरासरी वय ३० वर्षांचे आहे. कर्णधार फैज फझलने आतापर्यंत ७८६ आणि युवा अक्षय वाडकरने ६८० धावा केल्या आहेत.