नवी दिल्ली: आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशने माघार घेतल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वादावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. "पाकिस्ताननेबांगलादेशला चुकीच्या पद्धतीने उकसवले आणि फसविले," असा गंभीर आरोप शुक्ला यांनी केला आहे.
राजीव शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, भारत कधीही बांगलादेशच्या विरोधात नव्हता. आम्हाला मनापासून वाटत होते की बांगलादेशने या विश्वचषकात सहभागी व्हावे. आम्ही त्यांना पूर्ण सुरक्षेची खात्री दिली होती. भारतामध्ये खेळाडूंना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही दिला होता. मात्र, पाकिस्तानने या वादाला विनाकारण खतपाणी घातले.
'शेवटच्या क्षणी बदल शक्य नाही'
बांगलादेशने आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. यावर भाष्य करताना शुक्ला म्हणाले की, ऐनवेळी पूर्ण वेळापत्रक बदलणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असते. "बांगलादेशने हा विचार करायला हवा होता. आयसीसीने त्यांना पुरेसा वेळ दिला होता, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. परिणामी आयसीसीला त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी द्यावी लागली."
शुक्ला पुढे म्हणाले की, "ज्यांनी एकेकाळी बांगलादेशवर अत्याचार केले, तेच आज त्यांचे हितचिंतक बनून त्यांना चुकीच्या मार्गावर नेत आहेत. पाकिस्तानला हे सर्व शोभत नाही. त्यांनी बांगलादेशला भारताच्या विरोधात भडकवण्यापेक्षा स्वतःच्या क्रिकेटकडे लक्ष द्यावे. पाकिस्तान या विषयात विनाकारण पडला आहे. बांगलादेशला उकसवण्यामागे पाकिस्तानची भूमिका मोठी आहे. पाकिस्तानने पूर्वी बांगलादेशींसोबत (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) किती अन्याय आणि अत्याचार केलेले, हे संपूर्ण जगाला माहित आहे. खुद्द बांगलादेशी जनता हे विसरलेली नाही, म्हणूनच तो देश वेगळा झाला होता.", असे शुक्ला यांनी म्हटले.
वादाची ठिणगी कशी पडली?
आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी बीसीसीआयच्या सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला रिलीज केले होते. तेव्हापासूनच बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याच रागातून बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला होता.