नवी दिल्ली : ‘आयपीएल मेगा लिलावात चतुराईने आणि धाडसी निर्णय घेतल्यानंतर पंजाबचा संघ आता योग्य दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे, आयपीएल विजेतेपदाची त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा काळ संपण्याची शक्यता वाढली आहे,’ असा विश्वास भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने व्यक्त केला आहे.
एका कार्यक्रमात पठाण म्हणाला की, ‘स्पष्ट नेतृत्व आणि योग्य संघरचना यामुळे पंजाबची कामगिरी सुधारू लागली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील हा संघ गेल्या सत्रात उपविजेता ठरला होता. पंजाबसाठी संघाला नवे स्वरूप देण्यात नेतृत्त्वाची मोठी भूमिका राहिली आहे. आयपीएलमधील अर्धे सामने तुम्ही लिलावात जिंकता. मोठी रक्कम खर्च केली म्हणजे नेहमीच हवा तसा खेळाडू मिळेल असे नाही. पण, पंजाबला तसे खेळाडू मिळाले आणि ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील.’
पठाणने पुढे सांगितले की, ‘पंजाबने ग्लेन मॅक्सवेलसारख्या अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर करण्याचा कठोर निर्णय घेतला आणि आपली राखीव फळीही मजबूत केली. पंजाबने काही धाडसी, पण महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता त्यांच्या संघात अझ्मतुल्लाह उमरझई, मार्को यान्सेन आणि मार्कस स्टोइनिससारखे अष्टपैलू तसेच, चांगले युवा भारतीय फलंदाज आहेत. अय्यरला कर्णधार बनवल्यानंतर संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला. संघात स्पष्टता आहे आणि त्यामुळेचपंजाब योग्य दिशेने जात आहे.’