बंगळुरू : ‘रन मशिन’ चेतेश्वर पुजाराच्या नाबाद १३१ धावांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने कर्नाटकचा ५ गडी राखून पराभव केला. याबरोबरच त्यांनी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता सौराष्ट्रचा सामना विदर्भविरुद्ध ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जयपूर येथे होईल. सौराष्ट्र तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
पुजाराने २६६ चेंडूंत १३१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने शेल्डन जॅक्सन (१००) सोबत २१४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या दिवशी सौराष्ट्रला ५५ धावांची गरज होती. जॅकसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले १६ वे शतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सौराष्ट्रकडे ७ फलंदाज होते. त्यामुळे त्यांनी सहज खेळण्यावर भर दिला. सौराष्ट्रने विजयासाठीचे लक्ष्य ५५ धावा १७.४ षटकांत गाठले. विजय कुमारने ७५ धावा देत ३ बळी घेतले. काल पुजाराला पंचांनी नाबाद दिले होते. जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श करून गेला होता. तेव्हा तो ३२ धावांवर होता. पुजाराने आपल्या डावात १७ चौकार आणि जॅकसनने १५ चौकार लगावले. पुजाराला या सामन्यात जीवदान मिळाले ते खराब पंचगिरीमुळे. संपूर्ण सत्रात पंचगिरीचा स्तर हा सामान्य होता.