पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये सध्या एक नवा वाद उफाळून आला आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि रावळपिंडीझ यांच्यात झालेल्या सामन्यात, फिरकी गोलंदाज उस्मान तारिक याच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवरून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. रावळपिंडीझचा फलंदाज डॅरिल मिशेल याने तारिकच्या गोलंदाजीचा सामना करण्यास चक्क नकार दिल्याने मैदानात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उस्मान तारिक चेंडू टाकण्यापूर्वी जो काही क्षणांचा पॉज घेतो, त्यावरून हा सर्व वाद सुरू झाला. या पॉजमुळे डॅरिल मिशेल कमालीचा अस्वस्थ झाला. चेंडू नेमका कधी सुटणार याचा अंदाज येत नसल्याने, मिशेलने अनेकदा क्रीझ सोडून बाजूला होत आपण खेळण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. यामुळे खेळात व्यत्यय आला आणि अखेरीस पंचांना मध्यस्थी करावी लागली.
उस्मान तारिकचे स्पष्टीकरण
आपल्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर होणाऱ्या टीकेला उस्मान तारिकने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने आपल्या शरीराच्या असामान्य रचनेचा दाखला देत म्हटले की, च्या हाताची रचना सामान्य नाही. त्याच्या हातात दोन कोपर आहेत. या रचनेमुळे त्याला हात पूर्णपणे सरळ करणे कठीण जाते, ज्यामुळे लोकांना तो चेंडू फेकल्यासारखा वाटतो. दोनदा चाचण्या झाल्यानंतर त्याच्या ॲक्शनला अधिकृत मान्यता मिळाली आहे."माझ्या गोलंदाजीवर भाष्य करण्यापूर्वी लोकांनी क्रिकेटचा सखोल अभ्यास करावा, असा तारिकने टीकाकरांना सुनावले आहे.
आर अश्विन काय म्हणाला?
भारतीय अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याने या प्रकरणावर आपले परखड मत मांडले. अश्विन म्हणाला की, "जर तारिक चेंडू टाकण्यापूर्वी थांबत असेल, तर फलंदाजाला बाजूला होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा पंचांसाठी मोठा पेच ठरेल की, नक्की कोणाला ताकीद द्यायची, गोलंदाजाला की फलंदाजाला? पण इतिहास पाहता, आधी गोलंदाजालाच ताकीद दिली जाईल. मी तिथे असतो तर मी सुद्धा मिशेलसारखेच केले असते."