मुंबई : प्रबोधन मुंबई ट्वेंटी -२० क्रिकेट स्पर्धा ११ एप्रिल पासून गोरेगावच्या प्रबोधन क्रीडांगणावर सुरू होत असून यजमान प्रबोधन संघासह मुंबईतील अन्य सात सर्वोत्तम संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष आहे. गेली चाळीस वर्षे गोरेगावमध्ये आंतर शालेय क्रीडा महोत्सव, जलतरण,टेनिस, तिरंदाजी,बुद्धिबळ अशा खेळांच्या दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणारी असा प्रबोधनचा लौकिक आहे. ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेचा कालावधी चार दिवसांचा राहील व १४ एप्रिल रोजी दुपारी अंतिम फेरीचा सामना खेळविण्यात येईल.
मागील वर्षी या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दादर युनियन या संघाने विजेतेपद पटकावले असले तरी या वेळी त्यांना शिवाजी पार्क जिमखाना, पार्कोफोन क्रिकेटर्स. पय्याडे स्पोर्ट्स क्लब, एम.आय.जी. क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, सी.सी.आय. आणि यजमान प्रबोधन गोरेगाव या बलाढ्य संघांचा सामना करावा लागेल. यंदाही विजेत्यांना रोख १ लाख रुपये,
उपविजेत्यांना ५० हजार तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला परंपरेनुसार मोटर बाईक अशी पुरस्कारांची योजना आहे. प्रत्येक सामन्यातला उत्तम खेळाडू अशी अन्य आठ पारितोषिकेही दिली जातील अशी माहिती प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली आहे. प्रबोधन मुंबई टी-२० ला मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता तर आहेच पण त्याच बरोबर सर्व तांत्रिक मदतही दिली जाते. अंतिम सामन्याला दिलीप वेंगसरकर, बापू नाडकर्णी, उमेश कुलकर्णी,करसन घावरी, कुरूविला असे कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेटमधील शरद हजारे,अब्दुल इस्माईल,अमोल मुजुमदार असे दिग्गज आवर्जून उपस्थित असतात.