Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानवी 'बुद्धीभ्रष्ट'? फ्लॉप खेळाडूला 'आउट' करण्यासाठी PCB नं लावला AI वर डाव

निवड प्रक्रियेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) चा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:58 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तान क्रिकेटसंदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंना फ्लॉप खेळाडूंना रिप्लेस करण्यासाठी युवा खेळाडूच नाहीत. एवढेच नाही तर देशातील युवा क्रिकेटर्सचा डाटाच आमच्याकडे नाही, असे ते म्हणाले आहेत.

पाक क्रिकेटमध्ये खेळाडूंची निवड करण्यासाठी AI चा वापर 

देशांतर्गत क्रिकेटमधील चॅम्पियन्स कप स्पर्धेच्या निवड प्रक्रियेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) चा वापर केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगतलेली ही गोष्ट पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण करणारी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी संघ निवडताना एआयचा (AI) वापर केला होता, असे हहसिन नक्वी यांनी म्हटले आहे. 

निवड समितीला फक्त २० टक्के अधिकार, AI च्या माध्यमातून खेळला जाणार सिलेक्शनचा मोठा डाव

ते पुढे म्हणाले की, चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी ज्या १५० खेळाडूंची निवड झाली त्यातील ८० टक्के खेळाडू हे AI च्या माध्यमातून निवडले आणि उर्वरित २० टक्के खेळाडूंची निवड ही निवड समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून झाली. त्यामुळे या स्पर्धेतील निवड प्रक्रियेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. आम्ही निवड समितीला फक्त २० टक्के महत्त्व दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघातील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या जागी नव्या खेळाडूला दिली जाणारी संधी ही अगदी पारदर्शक असेल.कारण त्याच्या कामगिरीची संपूर्ण नोंद आमच्याकडे असेल. टीममध्ये निवड होण्यास जो पात्र आहे, तोच राष्ट्रीय संघात खेळताना दिसेल, असे मतही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी मांडले आहे.

बांगलादेश विरुद्धच्या पराभवाला निवड समिती कारणीभूत नाही, कारण... 

चॅम्पियन्स कप स्पर्धा ही सप्टेंबरच्या अखेरपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर आमच्याकडे सर्व खेळाडूंच्या कामगिरीची नोंद असेल. राष्ट्रीय संघात जो कामगिरी करत नाही त्याला रिप्लेस करण्यासाठी योग्य खेळाडूंची यादी आमच्याकडे तयार असेल. ही निवड वैयक्तिक मत किंवा इच्छां यापलिकडे जाऊन केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय बांगलादेशच्या लाजिरवाण्या पराभवात निवड समिती जबाबदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवड समितीने संघ व्यवस्थापनाला १७ खेळाडू दिले होते. कोच आणि कॅप्टन यांनी त्यातील काही खेळाडूंना बाहेर बसवले. ही त्यांची चूक असू शकते. यामुळे पराभवाचे खापर निवड समितीवर फोडता येणार नाही, असे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश