Join us

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आता भारतात खेळू शकणार पाकिस्तानचे खेळाडू

मोदी सरकारने दिलेल्या हमीनुसार आता पाकिस्तानचे खेळाडू भारतामध्ये येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 19:27 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. पण आता मोदी सरकारने हे बदलायचे ठरवले आहे. मोदी सरकारने दिलेल्या हमीनुसार आता पाकिस्तानचे खेळाडू भारतामध्ये येऊ शकतात.काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकात खेळू नये, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण भारतीय संघ विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळला आणि त्यांच्याबरोबरचा सामना जिंकला. या विजयानंतर काही दिवसात केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012 सालानंतर एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. गेल्या सात वर्षांमध्ये भारताने पाकिस्तानबरोबर मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण या दोन संघांमध्ये गेल्या सात वर्षांमध्ये एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही.

फेब्रुवारीमध्ये भारतात नेमबाजीचा विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतावे व्हिसा नाकारला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताच्या या गोष्टीवर ताशेरे ओढले होते.

केंद्र सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला हमीपत्र लिहून दिले आहे. या हमीपत्रामध्ये आम्ही पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये येण्याची आणि खेळण्याची परवानगी देत आहोत, असे लिहून दिले असल्याचे वृत्त 'जागरण' या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तान