टी-२० वर्ल्ड कप स्पर्धे आधी पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिला टी-२० सामना जिंकत पाकिस्तानच्या संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. घरच्या मैदानावरील पहिल्या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा आनंद गगनात मावेना, असे चित्र पाहायला मिळाले. वर्ल्ड कप किंवा आशिया कप स्पर्धा जिंकल्याचं फिलिंगच त्यांना आले अन् त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या संघाचे कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मग आकाश चोप्रानंही घेतली पाकिस्तानी पंतप्रधानांची फिरकी
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्याच्या मुद्यावरुन पाकचे पंतप्रधान आधीच चर्चेत होते. त्यात द्विपक्षीय मालिकेतील किरकोळ विजयामुळे ट्विट करुन ते चांगलेच फसले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रानंही त्यांची नाव न घेता फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी पंतप्रधानांचे ट्विट अन् त्यावर आकाश चोप्रानं दिलेली तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी
पाकिस्तानी पंतप्रधानांनी नक्वींचंही केलं कौतुक
लाहोरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्यासंघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा करत पाहुण्या संघासमोर १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. ट्रॅविस हेडच्या नेतृत्वाखालील संघ या धावांचाप पाठलाग करताना १४६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानच्या संघाने २२ धावांनी मिळवलेल्या या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि संपूर्ण संघाची प्रशंसा केली. नक्वींनी पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत, असे म्हणत ऑस्ट्रेलियाचा विजय देशासाठी अभिमानस्पद क्षण आहे, असा उल्लेख पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.
आकाश चोप्राने केली पोलखोल
पंतप्रधानांच्या पोस्टनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या हिंदी भाषेत समालोचनासाठी प्रसिद्ध असलेल्या आकाश चोप्राने सोशल मीडियावर कमेंट करून पाकिस्तान संघाच्या विजय म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, असे सांगितले आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आदर राखून सांगतो की, पाक संघाने जो विजय नोंदवला तो ऑस्ट्रेलियाच्या 'ब' संघाविरुद्ध एका द्विपक्षीय टी-२० मालिकेतील आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू या मालिकेत संघासोबत नाहीत. १७० धावांच्या सामन्यात २० धावंनी जिंकणे ही फार मोठी गोष्ट वाटत नाही" असा रिप्लाय पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ट्विटवर दिला आहे. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पाकिस्तानसाठी हा विजय मोठा का?
पाकिस्तानच्या संघाने २६५० दिवसांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. त्यामुळे हा विजय त्यांना मोठा वाटू शकतो. टी-२० विश्वचषकापूर्वी त्यांनी हा डाव साधला असला तरी खरी परीक्षा ही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धाच असेल.